जालना - 'भाजप सरकारने नोटाबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेवर घाला घातला आहे. या तुघलकी निर्णयाबाबत आता कुठेतरी समाज माध्यमातून आवाज उठवला जात आहे. या भितीपोटीच 2018 मध्येच निवडणुका घेण्याचे या सरकारचे षड्यंत्र आहे,'' असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले, 'आघाडी सरकारच्या काळात राज्य भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प केला होता. त्यात यशही आले होते; परंतु "अच्छे दिन'ची स्वप्न दाखवून अंधारात ढकलणाऱ्या सध्याच्या राज्य सरकारला आता काय म्हणावे? सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेला जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी रस्त्यावर येण्याची गरज काय?'' शिवसेना नुसते फोटोसेशन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
"मुदतपूर्व' कॉंग्रेस तयार
निवडणुकीचे निकाल लागताच राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. त्या वेळी ते खरे वाटत नव्हते; परंतु आता मात्र खरे वाटू लागले आहे. राज्यातील एकूणच राजकीय स्थिती पाहता मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता वाटते, असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले. निवडणूक कधीही झाली तरी कॉंग्रेस तयार असल्याचे ते म्हणाले.
किती येतात अन् जातात
कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले की, पक्षात असे कित्येक जण येतात आणि जातात. त्यांच्या येण्याने आणि जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. कॉंग्रेस हा विशाल पक्ष आहे.
|