बीड - जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळेच मागचे चार वर्षे टंचाई जाणवली नाही. टॅंकर लागले नाहीत. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे टंचाई आहे. "जलयुक्त'बाबत विरोधकांची टीका अभ्यासशून्य असल्याची टीका राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
मुंडे यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी (ता. 15) जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चारा छावण्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
मुंडे-मेटेंना कोपरखळी, शिवसेनेला शुभेच्छा!
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, की विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही बैठकीला उपस्थित राहून त्यांनी प्रश्न मांडले नाहीत. राजकारण सोडून जिल्ह्याच्या प्रश्नांना त्यांनी वेळ द्यावा, तर मेटेंबाबत "तो त्यांच्या सेन्सॅरिटीचा प्रश्न आहे' असे त्या म्हणाल्या. तर जिल्ह्यातील शिवसेनेचा दुष्काळ संपविण्याच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाहनाबाबत "त्यांना शुभेच्छा आहेत', राष्ट्रवादी कमी होऊन जिल्ह्यात शिवसेना वाढली तर हरकत नाही. मात्र, भाजप कमी होणार नाही, असे त्या म्हणाल्या.
|