लातूर ः एकेकाळी दुधाचा महापूर असलेल्या लातूर जिल्ह्यात आता दुधाचे उत्पादन घटत चालले आहे; पण झालेल्या उत्पादनाला शासनाकडून चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाला दूध देण्याकडे दूध उत्पादकांनी पाठ फिरविली आहे. ते खासगी कंपन्यांना दुधाची विक्री करताना दिसत आहेत. खासगी कंपन्या पाच ते सात रुपये अधिक भाव देत दुधाची खरेदी करीत आहेत. खरेदी केलेले 90 टक्के दूध हे हैदराबादला विक्री केले जात आहे. डिसेंबर या एका महिन्यात सुमारे 80 हजार लिटर दूध हैदराबादच्या बाजारपेठेत विकले गेले आहे. महाराष्ट्रात केवळ 25 ते 30 हजार लिटरच दुधाची विक्री झाली आहे.
जिल्ह्यात खासगी कंपन्यांचे जाळे
जिल्ह्यात दूध खरेदीसाठी खासगी कंपन्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. दूध उत्पादकांपर्यंत पोचत त्या दुधाचे संकलन करीत आहेत. रिलायन्स, अमूलसारख्या कंपन्यांत यात उतरल्याच आहेत; पण जर्शी, मस्तकी, उजना अशा डेअरींचे संकलनही मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा - अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद
लाख लिटरची खरेदी
जिल्ह्यात एप्रिलपासून ते डिसेंबरपर्यंतची आकडेवारी पाहिली तर शासनच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या दुधाची खरेदी करताना दिसत आहेत. महिन्याला या कंपन्या एक लाख लिटरपेक्षा अधिक दुधाची खरेदी करीत आहेत.
पाच ते सात रुपयांचा फरक
शासन दुधाला जास्त दर देत नाही; पण खासगी कंपन्या मात्र पाच ते सात रुपये अधिक दर देत दुधाचे संकलन करीत आहेत. चार पैसे जास्त मिळत असल्याने दूध उत्पादकही खासगी कंपन्यांनाच दुधाची विक्री करीत आहेत.
दुधाला हैदराबादची बाजारपेठ
जिल्ह्यात शासन व सहकारी संस्थांच्या माध्यमातून संकलन केलेले जाणारे दूधच फक्त महाराष्ट्रात विकले जात आहे. ते प्रमाण अत्यल्प आहे; पण खासगी कंपन्यांनी खरेदी केलेले दूध मात्र हैदराबाद बाजारपेठेत नेले जात आहे. एकट्या डिसेंबरमध्ये सुमारे 80 हजार लिटर दूध हैदराबादला पाठविण्यात आले आहे. स्थानिक बाजारपेठेत केवळ 25 ते 30 हजार लिटरचीच विक्री करण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.