लातूरच्या द्राक्षांची युरोपात गोडी

दोन हजार शंभर टन निर्यात; प्रतिकिलो मिळाला ८० रुपये भाव
Latur Two thousand one hundred tons grapes exported in Europe
Latur Two thousand one hundred tons grapes exported in Europesakal

लातूर : मराठवाड्यात लातूर जिल्हा गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष निर्यातीत आघाडीवर आहे. कोरोनाचे संकट असतानाही येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जगवल्या. एवढेच नव्हे तर द्राक्षांची गोडी युरोपियन देशांना चाखायला लावली. जिल्ह्यातून यंदा दोन हजार शंभर टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. प्रतिकिलोला सरासरी ८० रुपये भाव मिळाला असून यातून कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी कृषी क्षेत्रात वेगवेगळे पॅटर्न निर्माण करीत आहेत. उसाच्या क्षेत्रात लातूर आघाडीवर आहे. सोयाबीनसाठी हा जिल्हा तर हबच बनला आहे. तुरीचा देशाचा भाव येथूनच निघतो. त्यानंतर द्राक्ष निर्यातीतही जिल्हा आघाडीवर आहे. येथील द्राक्ष उत्पादकांवर गेल्या काही वर्षांत अनेक संकटे आली. परेदशातून द्राक्ष परत पाठवली गेली. त्यामुळे ती समुद्रात टाकण्याची वेळ येथील उत्पादकांवर आली. तरीही उत्पादक डगमगले नाहीत. पुन्हा जिद्दीने उभारी घेऊन त्यांनी द्राक्ष उत्पादन घेतले. आजही जिल्हा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मराठवाड्यात आघाडीवर आहे.

यंदाही जिल्हा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात आघाडीवर राहिला. कृषी विभागाकडे द्राक्ष निर्यातीसाठी १२७ बागांची नोंद झाली होती. यातील ९० टक्के बागा या एकट्या औशा तालुक्यातील आहेत. विशेषतः किल्लारी, सिरसल, लाजमना, कारला, मंगळूर आदी भागांतील शेतकरी अशा द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. यावर्षी दहा मार्चपासून द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली. पाच मेपर्यंत ती होत होती. या काळात दोन हजार शंभर टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. यातील बहुतांश द्राक्षे युरोपियन देशांत गेली असून काही प्रमाणात युकेमध्येही पाठविण्यात आली. युरोफ्रुट कंपनीच्या माध्यमातून बाराशे टन, फ्रेशस्टॉप कंपनीद्वारे सातशे टन, पॅनॅशिया कंपनीतर्फे २०० टन द्राक्षे निर्यात झाली. क्रिमसन, थॉमसन, टुए क्लोन अशा जातीची ही द्राक्षे होती. प्रतिकिलो सरासरी ८० रुपये भाव मिळाला आहे. त्यातून कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.

द्राक्ष बागा जगवताना अनेक अडचणी येत आहेत. द्राक्षाच्या भावावर बंधने आहेत; पण त्यासाठी लागणारे औषधे, खत, कीटकनाशके, तणनाशकाच्या किमतीवर बंधने नाहीत. या वस्तूंच्या भरमसाट किमतीमुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. यावर शासनाने नियंत्रण व बंधने असली पाहिजेत. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडतील.

- शिवाजीराव सोनवणे, अध्यक्ष, जिल्हा द्राक्ष उत्पादक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com