Latur : वैद्यकीय मंत्र्यांच्या घोषणा हवेतच ;व्यथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची; तारेवरची कसरत सुरूच

महाविद्यालयाच्या समस्या आजही कायम आहेत.
latur
latur sakal

लातूर - येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होऊन सोळा वर्ष होऊन गेली आहेत. पण या महाविद्यालयाच्या समस्या काही संपलेल्या नाहीत. महाविद्यालयासाठी जो स्टाफिंग पॅटर्न असतो तो सोळा वर्षातही या महाविद्यालयाला मिळालेला नाही ही या महाविद्यालयाची शोकांतिका आहे. लातूरचे आमदार अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षणमंत्री होते. त्यानंतर आलेले पालकमंत्री गिरीश महाजनही वैद्यकीय शिक्षणमंत्री राहिले.

त्यानंतर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षणमंत्री झाले. या तीनही मंत्र्यांनी या महाविद्यालयाच्या समस्या सोडवण्याच्या घोषणा केल्या पण त्या हवेतच विरल्या आहेत. महाविद्यालयाच्या समस्या आजही कायम आहेत. साधी वर्ग तीन व चारची पदेही हे मंत्री भरू शकलेली नाहीत. त्यामुळे महाविद्यालय व रुग्णालयालाचा कारभार चालवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमी मनुष्यबळावर काम करीत रुग्णांचा मृत्यू होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

स्थानिक असून उपयोग नाही

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आले. लातूर दरवर्षी हजारो डॉक्टर देत आहे. त्यामुळे लातूरचे हे महाविद्यालय अद्यावत असणे आवश्यक होते. पण या महाविद्यालयाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यात मनुष्यबळाची कमतरता ही तर सर्वात मोठी समस्या आहे.

महाविद्यालयाला सिव्हील हॉस्पीटल सलग्नित झाल्यानंतर त्यांचा जो स्टाफ आला त्यावरच महाविद्यालयाचा कारभार सुरु आहे. महाविद्यालयाचा स्टाफ म्हणून मिळालेलाच नाही. युतीच्या काळात संभाजी पाटील निलंगेकर हे पालकमंत्री होते. त्यांनी महाविद्यालयाचा केवळ आढावा घेण्याचे काम केले.

पुढे काही झाले नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते आले. त्याच वेळी महाविद्यालयाचा मनुष्यबळा सारखा व इतर सर्व प्रश्न मार्गी लागणे आवश्यक होते. पण त्यांचाही महाविद्यालयाला काही उपयोग झाला नाही. हे दोनही मंत्री स्थानिक असून सुद्धा महाविद्यालयाच्या समस्या कायमच राहिल्या.

महाजनांचा तर मुंबईतून कारभार

महाविकास आघाडी सरकारला पायउतार केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार आले. त्यात गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षणमंत्री झाले. त्यांच्याकडेच लातूरचे पालकत्व आले आणि आजही ते कायम आहे. तसेच त्यांचे शासनाच मोठे वजन आहे.

त्यामुळे त्यांच्याकडूनही महाविद्यालयाच्या समस्या सुटतील अशी आशा लातूरकरांची होती. पालकमंत्री झाल्यानंतर पहिली डीपीसीची बैठक घेतल्यानंतर दर वीस दिवसाला आपण लातूरला येवू, लातूरसाठी मंत्रालयात खास अधिकारी नियुक्त करु अशा घोषणा महाजनांनी केल्या होत्या.

पण महाविद्यालयाचे प्रश्न तर सोडाच पण डीपीसीच्या काही बैठका देखील त्यांनी आॉनलाईनच घेतल्या. मुंबईतूनच त्यांनी कारभार हाकायला सुरुवात केल्याने महाविद्यालयाचे प्रश्न तसेच राहिले.

मुश्रीफांची भेटही निष्फळ?

राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. हसन मुश्रीफ यांच्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी पडली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ता. १७ सप्टेंबर रोजी ते लातूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी या महाविद्यालयास भेट देऊन बैठक घेतली. वैद्यकीय महाविद्यालयाला बळकटीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली.

येत्या पंधरा दिवसात वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण सकारात्मक असून त्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली होती. ही घोषणा करुन वीस दिवस होऊन गेली तरी ही पदे भरलेले नाहीत. तीन वैद्यकीय मंत्र्यांच्या नुसत्या घोषणानंतरही या महाविद्यालयाच्या समस्या मात्र कायमच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com