औरंगाबाद - 'पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. असे असले तरी सध्या लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पक्षांसोबत कॉंग्रेस आघाडी करणार आहे,'' अशी माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
चव्हाण म्हणाले, 'देश व राज्यात लोकशाहीला मजबूत करणाऱ्या संस्था धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आघाडीचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर दहा छोट्या पक्षांबरोबरही चर्चा केली जाईल. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही आघाडीत यावे, एकत्रित निवडणुका लढाव्यात, अशी आमची इच्छा आहे; तथापि एमआयएम जातीयवादी पक्ष असल्याने त्या पक्षाला कॉंग्रेस सोबत घेणार नाही,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहयोची कामे सुरू करा
मराठवाड्यातील दुष्काळाच्या अनुषंगाने ते म्हणाले, ""सरकारने दिवास्वप्न दाखवणे सोडून दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचे काम करावे. तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करावीत, चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, तहसीलस्तरावर पाण्याचे टॅंकर सुरू करण्याचे अधिकार द्यायला हवेत,''
भाजप बुडती नौका, आता कोणी बसायला तयार नाही. शिवसेना काही फारकत घेईल असे वाटत नाही, त्यांच्यावर दबाव असावा.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
|