लॉकडाऊनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, कसे? ते वाचाच

File photo
File photo

नांदेड : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उन्हाळी हंगामातील पिकांची नासाडी होत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईचा कालावधी हातचा जात असल्यामुले वधू पिता चिंतीत होत आहे. त्यामुळे माल उत्पादक शेतकरी व विवाहाचे मुहूर्त काढलेल्या वधुपित्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे.

फळ-भाज्यांचे होतेय नुकसान
कोरोना विषाणुमुळे देशच नव्हेतर पूर्ण जग संकटात सापडले आहे. त्यामुळे हे संकट कधी दूर होईल याचीच वाट पाहत आहेत. त्यानंतर वातावरण व व्यवहारही कधी सुरळीत होण्यास बराच कालावधी लागेल. जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय, छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार यांच्यावर कोरोनाचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यातही सर्वाधिक नुकसान शेतकरी वर्गाचे झाले आहे. कारण भाजीपाला, फलोत्पादन हे नाशवंत पिके असतात. त्यामुळे त्यांची नियोजित वेळीच बाजारपेठेत विक्री होणे गरजेचे असते. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांचा भाजीपाला, टोमॅटो, वांगे, भेंडी, चवळी, पालक, कोथिंबीर आदी भाजीपाला व टरबूज, खरबूज, पपई, लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळींब आदी फळांचे अतोनात नुकसान होत आहे.

शेतमाल विक्रीचा प्रश्‍न
शेतकऱ्यांनी काठीण्य पातळीवर केलेल्या उत्पादीत माल बाजारात नेण्याकरिता कुठल्याच प्रकारची व्यवस्थाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडल्या गेले आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकरी वधुपित्यांनी यंदा मुला-मुलींच्या विवाहाचे नियोजन केले होते ते नियोजन देखील पूर्णतः विस्कळीत झाले आहे. ऐन लग्नसराईचा कालावधी हातातून जात आहे. मात्र घरात शांततेने बसण्याऐवजी दुसरा कुठला पर्यायच उरला नाही. घरातील शेतमाल तसाच पडून आहे, त्याची कधी विक्री करावी अन कधी नाही? हा देखील मोठा प्रश्न उभा राहीला आहे.

मदतीलाही पाझर फुटेना
मागील महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. त्यात रब्बीचे गहू, हरभरा व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. तेव्हा मात्र नुकसानीच्या सर्वेचे आदेशही वरिष्ठ पातळीवरून देण्यात येऊन तात्काळ मदतीची गर्जनाही झाली होती. त्यानंतर कोरोनाचे सावट उद्भवल्याने सर्वे तर सोडाच साधे नुकसानीबाबत ‘ब्र’ शब्दही निघणे सध्या कठीण झाल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कोरोनाच घेऊन जातो की काय, अशी परिस्थिती नक्कीच सध्या तरी निर्माण झाली आहे.

कवडीमोल दराने विक्रीची वेळ
अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ठिबक सिंचनावर खर्च करत टरबूज, खरबूज, टोमॅटो, काकडी अशी पिके घेतली आहेत. त्यासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र ही पिके विक्रीच्या काळातच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे ही पिके शेतातच तोडणीअभावी खराब होत आहेत. तोडलेला मालही कवडीमोल दराने विकावा लागत आहे.
- सदाशिव पावडे (शेतकरी)

वधुपित्यांचा जीव टांगणीला
वधू पित्यांकडून डिसेंबरपासूनच स्थळांचा शोध सुरु होतो. सुगी संपल्यानंतर एप्रिल, मे दरम्यान लग्नाच्या तारखांना प्राधान्य असते. यंदाही ही अनेकांनी विवाहाच्या तारखा काढल्या. मंगल कार्यालये, बॅंड, मंडप, स्वयंपाकी, वाहने आदींच्या आगाऊ पैसे दिले आहेत. मात्र संचारबंदीमुळे जीव टांगणीला लागला आहे.
- साहेबराव घुगे पाटील (शेतकरी)

भाजीपाला कुणीच घेईना
सध्या कोरोनाच्या धास्तीने लाॅकडाऊन सुरु असल्याने बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. भाजीपाला विक्रीला जरी परवानगी असली तरी जास्तीचा हा भाजीपाला शहरात नेण्यासाठी अडचणीचे व महागाचे ठरत आहे. तर बाजारपेठा बंदमुळे रब्बीतील माल घरातच पडून असल्याने आर्थिक संकटात जगावे कसे? असा प्रश्न पडला आहे.
- सुलोचनाबाई घुगे (महिला शेतकरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com