सेलू : तीन शहरांसह शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या लोअर दूधना प्रकल्प धरणात केवळ ३.८६ इतकाच जलसाठा उपलब्ध असून बाष्पीभवनामुळे प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. पाच वर्षांनंतर प्रकल्पातील पाणीपातळीने निच्चांक गाठल्याने यंदा पाणी टंचाईबरोबरच यावर अवलंबून असलेला मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अनेक मच्छिमार स्थलांतर करत असून पर्यायी व्यवसायाकडे वळले आहेत.
जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर लोअर दुधना प्रकल्पात वेगाने पाणीसाठा होतो. इ. स. २०२२ मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती. मात्र प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा केल्यानंतर असंपादित जमिनीवरील पिकांचे नुकसान होत असल्याने त्यावेळी प्रकल्पात ७५ टक्केच पाणी ठेवून उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.
त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांना कालव्यातून पाणी गतवर्षी सोडण्यात आले होते. प्रकल्पातून दररोज जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा शहरासह वॉटर ग्रीड योजनेतील गावांना तसेच सेलू शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी घेतले जाते. त्यामुळे प्रकल्पातील पाणीपातळी कमी झाली होती. तसेच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नव्हता. परिणामी प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.
पाणी कमी झाल्याचा मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे. दुधना प्रकल्पात कथला, मरळ, वाम आदी जातीचे मासे आढळतात. परंतु प्रकल्पात सद्यस्थितीत पाणी कमी असल्याने मासे कमी झाले आहेत. परिणामी मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जलशयातील पाणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणी टंचाईचेही संकट तालुक्यावर ओढावणार असल्याचे दिसून येत आहे. लोअर दुधना प्रकल्पाच्या जवळ मासेमारी करून उदरनिर्वाह करणारी शेकडो कुटुंब आहेत. परंतु प्रकल्पात पाणी नसल्याने मासे कमी झाले आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणी सापडला असून, शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
दुधना प्रकल्पातील मासे गोड्या पाण्यातले असल्याने महानगरात येथील माशांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मुंबई, ठाणे, दिल्ली, कोलकाता, हावडा आदी महानगरात दररोज ६० किलोचे ५ ते ८ डाग रेल्वेने निर्यात केले जातात. परंतु, यावर्षी धरणातील जलसाठा अत्यल्प असल्याने केवळ एकच डाग निर्यात केला जात आहे.
धरणातील जलसाठा अत्यल्प झाल्याने मच्छिमारांना मासेच सापडत नसल्याने अनेक मच्छिमार आपल्या कुटूंबासह उदरनिर्वाहासाठी अन्य शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत. यंदा धरणात अत्यल्प जलसाठा राहिल्याने शासनाने दुधना प्रकल्पातील मासेमारीची निविदा काढतांना मच्छिमारांना सवलत देण्याची गरज आहे.
— माऊली लुचारे, विक्रेता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.