अवयवदानाचे प्रचारक : माधव अटकोरे

Nanded News
Nanded News

नांदेड : अवयवदानाबद्दलचे गैरसमज आणि अज्ञान खऱ्या अर्थाने दूर करायचे असतील तर प्रत्येक ग्रामपंचायतीने अवयव दानाची प्रतिज्ञा जाणून घेतली पाहिजे. ग्रामसभा, वाचनालय, शाळा, मंदिर, पारायण, मार्गदर्शन शिबीर, पोलिस ठाणे, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, महाविद्यालये, आणि सार्वजनिक कार्यक्रमांत अवयवदानाचा विचार पेरण्याची गरज आहे. 
 
जन्मलेला प्रत्येक जीवाला मृत्यू कधी, कसा येईल हे सांगता येत नसले तरी एक दिवस मृत्यू येणारच हे वैश्‍वीक सत्य असूनही आपल्याला आवडत नाही. मृत शरीर जाळून किंवा दफन करून काहीच फायदा होत नाही. देहदान हे मृत्युनंतरच्या चार तासातच करता येते. उशीर झाल्यास त्यातील कोणताही अवयव कामी येत नाही. एका देहदानातून आठ गरजुंना नवे जीवन मिळते. आणि दान केलेल्या अवयवाच्या रुपाने अनेक वर्षे आपणही जीवंत राहू शकतो. 

अशी मिळाली स्फूर्ती
अवयवदान हा एकच विचार घेवून मी मागील तीन वर्षात भटकंती करतो. अवयवदानाची अधिक माहिती घेण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरच्या अनेक चकरा केल्या. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अनुभव जाणून घेतले त्यामुळे स्फूर्ती मिळाली. अवयवदानाचा विचार समाजाला सतत सांगताना त्याची सुरूवात स्वतःपासून करावी असे वाटले. दानाचे प्रकार अनेक आहेत. आपल्या समाजातील काही लोक फक्त रक्तदानापर्यंत येऊन थांबतात. अवयवदानापर्यंत जातच नाहीत. अवयवदान हा विचार प्रत्येकाला अवघड वाटतो. परंतु, हाच विचार सर्वश्रेष्ठ आहे.

अन् २० वकिलांनी केला अवयवदानाचा संकल्प
नांदेड जिल्ह्यात अवयवदान जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले. एमजीएम महाविद्यालय, यशवंत कॉलेज, सायंस कॉलेज, डेन्टल कॉलेज, शहरत अवयवदान जनजागृती फेरी, नांदेड न्यायालय अशा विविध ठिकाणी चर्चा आणि मार्गदर्शन केले. एवढेच नव्हे तर लातूरच्या वसंतराव काळे होमिओपॅथी कॉलेज, पुणे येथील भावसार महिलांच्या अवयवदान जनजागृती कार्यक्रमात विचार मांडले. नांदेड धर्मादाय उपायुक्त कार्यालत खास मार्गदर्शन केल्याने २० वकिलांनी अवयवदानाचा संकल्प केला. परंतु, अजून पुष्कळ काम बाकी असल्याचे श्री. अटकोरे सांगतात.

हे देखील वाचा - मनोरूग्णांना घातली अंघोळ, केली कटींग दिले नवे कपडे ​

५० लोकांनी केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प
नांदेड येथे झालेल्या ४२ व्या मराठी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकारांसोबत संवाद साधून त्यांना ‘अवयवदान पार्थिवाचे देणे’ या माझ्या पुस्तकच्या प्रती सप्रेमभेट दिल्या. जिल्ह्यात आतापर्यंत चार ग्रीन कॉरिडॉर झाले. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले. नांदेड मनपाचे माजी नगरसेवक निवृत्ती सदावर्ते यांनी जीवंतपणीच देहदान संकल्प केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा देह शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला दान करण्यात आला. एकूण ५० लोकांनी मरणोत्तर देहदान संकल्प केला आहे.
  

समाजमन बदलविण्याची गरज
वैद्यकीय तंत्रज्ञान हे वेगाने पुढे जात आहे. पण समाजमनाची मानसिकता अजूनही शंभर वर्षांपूर्वीचीच बघायला मिळत आहे. समाजमनाची मानसिकता आणि तंत्रज्ञान यांच्यातील तफावत भरून काढण्याची आवश्यकता आहे. ही तफावत दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. 
- माधव अटकोरे, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com