Manoj Jarange : गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन, तरी कारवाया ; सगेसोयऱ्यांबाबतच्या मागणीवर ठाम

लोकसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणार आहे. जातीवर आधारित सभा नाही तर संवाद बैठका घेत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal

बीड : लोकसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणार आहे. जातीवर आधारित सभा नाही तर संवाद बैठका घेत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. एकीकडे गुन्हे मागे घेण्याची घोषणा करतात, दुसरीकडे नव्याने गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

परळीत जाताना बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘न्यायदेवतेने आम्हला नेहमीच न्याय दिला. आम्हीही न्यायालयाचा सन्मानच केला. एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घेतले जात असल्याची घोषणा करायची, दुसऱ्या बाजूला नोटिसा पाठविल्या जात आहेत. माझ्या घरावर अनेक नोटिसा डकविल्या जात आहेत. बीडच्या पोलिसांकडून जालन्यातील मराठा समाजाच्या मुलांना त्रास दिला जात आहे. सभेसाठी वापरलेल्या जेसीबींचा शोध सुरू आहे. गृहमंत्र्यांनी असले प्रकार बंद करावेत. जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही’.

Manoj Jarange
Manoj Jarange : नेत्यांना गावबंदी करू नये ; मनोज जरांगे यांना खंडपीठाचे निर्देश

राज्य सरकारने जाहीर केलेले दहा टक्के आरक्षण मान्य नाही. ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण राहिले नसल्याने नव्या आरक्षणाचा लाभ ज्यांना हवा आहे, त्यांनी घ्यावा. त्याला आमचा विरोध नसेल. सगेसोयऱ्यांबात निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ठाम असल्याचे जरांगे म्हणाले.

दरम्यान, परळीत आज सायंकाळच्या बैठकीला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. याबाबत आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यावर आज झालेल्या सुनावणीत खंडपीठाने अटी-शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी देण्याचा आदेश दिला.

पालकमंत्र्यानी गुन्हे मागे घ्यावेत

परळी वैजनाथ : गृहमंत्री संपूर्ण राज्यात मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. बीड जिल्ह्यातही तसे झाले आहे. या गुन्ह्यांचे दायित्व पालकमंत्र्यांचे आहे. त्यांनी लक्ष घालून गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे यांच्या उपस्थितीत बुधवारी महासंवाद बैठक झाली. तालुक्यासह अंबाजोगाई व इतर ठिकाणांहून मराठा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जरांगे म्हणाले, ‘‘संवाद बैठकीचे रूपांतर मराठा एकजुटीने जाहीर सभेत केले. याबद्दल परळीकरांचे आभार म्हणत आपली लढाई चुकीची नाही, समाजाच्या लेकरांच्या न्यायाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जो कोणी मला विरोध करतो, त्यालाच मी विरोध करतो.’’ आपली एकजूट वाया घालवायची नाही, शहरातील आमचे बॅनर का काढले, आम्ही आता बैठका घ्यायच्या नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. अगोदर मी पालकमंत्र्यांना बोललो, पण त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. म्हणून काही बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतरवालीत सभेची तयारी

वडीगोद्री: अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मोठ्या मैदानावर रविवारी (ता. २४) सकाळी दहाला मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार असून, मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. टिकणारे मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांवर शासन स्तरावर निर्णय होत नसल्याने समाजबांधवांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी यापूर्वी मांडली होती.

त्यानुसार अंतरवाली सराटी ते रामगव्हाण मार्गावरील मैदानावर ही बैठक होत आहे. बैठकीसाठी एक दिवस आधी येणाऱ्यांची बैठकस्थळी राहण्याची व जेवणाची व्यवस्था परिसरातील नागरिकांकडून होत आहे. त्याशिवाय पाणी, पार्किंग, वाहतूकव्यवस्था आदींचे नियोजन केले जात आहे. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com