औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांसह विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार व्यवस्थापक व विभागातील अन्य अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, मोबाईल चोवीस तास सुरू ठेवावा, असे आदेश बजावण्यात आले आहेत.
एसटी महामंडळाची बससेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याच्या व्यतिरिक्तही प्रवासी सेवेच्या दृष्टीने विचार करणे अपेक्षित आहे; मात्र विभागस्तरावरील अनेक अधिकारी, कर्मचारी ड्यूटी संपली, की फोन बंद करून ठेवतात. या प्रकाराने आपत्कालीन परिस्थिती, अपघात वा महत्त्वाच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होते. महामंडळाने यापूर्वीही मोबाईल फोन कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. असे असतानाही, या सूचनांची अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल न घेतल्याने मोबाईल बंद ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.
आता महामंडळाच्या वतीने थेट विभागीय कार्यालयांना भ्रमणध्वनी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतरही भ्रमणध्वनी बंद केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा त्या महिन्याचा संपर्क भत्ता कपात केला जाणार आहे.
|