परभणी - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सर्व प्रथा मोडीत काढल्या आहेत. दरवर्षी 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होतो; मात्र यंदा जानेवारीतच अधिवेशनाला सुरवात करून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केली.
नांदापूर (ता. परभणी) येथे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत वैजनाथराव रसाळ यांचा मरणोत्तर कार्यगौरव शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाला. या वेळी विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले, की शेतकरी आत्महत्या हे संघटनेच्या चळवळीपुढचे आव्हान असून, अपयशदेखील आहे. एवढी वर्षे झाली, संघटना सुरू असतानाही शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण न होणे म्हणजे अपयश म्हणावे लागेल. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संघटना फुटल्या तरी त्यांचे विचार एकच आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
|