औरंगाबाद - आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट पसरल्याचे शासकीय यंत्रणेनेच स्पष्ट केले आहे. सुरवातीपासूनच कधीतरी, कुठेतरी झालेल्या आणि अखेर "अत्यल्प'वरच माघार घेतलेल्या पावसाचा फटका बहुतांश पिकांना बसला आहे. मराठवाड्यातील एकूण 8 हजार 533 गावांपैकी केवळ औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील 2 हजार 958 गावांची हंगामी पीक पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महसूल विभागाने याबाबतचा अहवाल मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठविला आहे.
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतही अशीच स्थिती असून पन्नासपेक्षा कमी पैसेवारीच्या गावांची संख्याही मोठी असण्याची शक्यता आहे. मात्र या पाचही जिल्ह्यांतील पिकांची पैसेवारी पन्नापेक्षा अधिक असल्याचे महसूल विभागाने म्हटले आहे.
यंदा पावसाने सुरवातीपासूनच दगा दिल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. अत्यल्प पावसामुळे बहुतांश पिके करपून गेली आहेत. तग धरून असलेल्या पिकांतून उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बहुतांश जलप्रकल्पही कोरडे असल्याने आगामी रब्बी हंगाम आणि पाण्याच्या टंचाईची टांगती तलवार असणार आहे.
शासन निर्णयानुसार खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 30 सप्टेंबरला जाहीर करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मराठवाड्यातील 8 हजार 533 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 1 हजार 355 पैकी 1 हजार 335 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी तर केवळ 20 गावांची पैसेवारी 50 पेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले.
अपुऱ्या पावसाची समस्या असूनही परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी 50 पेक्षा जास्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा - एकूण गावे - 50 पेक्षा कमी पैसेवारीची गावे
औरंगाबाद - 1355 - 1335
जालना - 971 - 952
बीड - 1402 - 671
|