84 शेतकऱ्यांनी मिळून घेतले एवढे कर्ज...

file photo
file photo

औरंगाबाद : राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयाअंतर्गत बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना राबविली जात आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 29) मराठवाड्यातील पाच बाजार समित्यांतून 84 शेतकऱ्यांनी 3,892 क्‍विंटल शेतमाल तारण ठेवत 91 लाख 47 हजार 17 रुपयांचे कर्ज घेतले आहे. पीककर्ज व इतर कृषीविषयक कर्जापेक्षा ही प्रणाली सोपी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली. 

शेतकऱ्यांना हमी अथवा अपेक्षित दरापेक्षा कमी दराने आपला शेतमाल विकण्याची वेळ येऊ नये. प्रसंगी गरज भागविण्यासाठी शेतमाल अत्यल्प व्याजदराने तारण ठेवून त्यांना हवी असलेली रक्‍कम मिळावी व त्यांची गरज भागली जावी यासाठी पणन मंडळाने शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत परिणामकारकरीत्या राबविण्यासाठी मंडळाच्या वतीने जागृती करण्यात आली. यामुळे ही योजना फायद्याची असल्यामुळे शेतकरी याकडे वळल्याची माहिती पणनतर्फे देण्यात आली आहे. 

स्वनिधीतून राबविली योजना 
गेल्या वर्षी म्हणजे 2018-19 मध्ये काही बाजार समित्यांनी स्वनिधीतून ही योजना राबविली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, जवळाबाजार, वसमत, परभणी जिल्ह्यातील सेलू, परभणी, पाथरी, मानवत, जिंतूर आणि जालना जिल्ह्यातील परतूर, जालना, मंठा, घनसावंगी, अंबड मिळून अशा 14 बाजार समित्यांनी ही योजना राबविली. औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 585 शेतकऱ्यांनी 25 हजार 934 क्‍विंटल मका, हळद, सोयाबीन, तूर, चणा, गहू, मूग, उडीद शेतमाल तारण ठेवत 6 कोटी 31 लाख 13 हजार 4 रुपयांचे कर्ज घेतले होते. पणन मंडळाने त्यापैकी 3 कोटी 70 लाख 47 हजार 324 रुपयांची प्रतिपूर्ती केली होती. साधारणपणे 1 ऑक्‍टोबर ते 30 सप्टेंबरदरम्यान राबविल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील परतूर, जिंतूर, परभणी, पाथरी, मानवत या पाच बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यास सुरवात केली आहे. 

पणनने केली 30 लाखांची परिपूर्ती 
29 नोव्हेंबरपर्यंत जवळपास 84 शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद आदी 3 हजार 892 क्‍विंटल 72 किलो शेतमाल तारण ठेवला. 12 कोटी 47 लाख 5 हजार 470 रुपयांच्या या शेतमालासाठी बाजार समितीने 91 लाख 47 हजार 17 रुपये बाजार समितीने शेतकऱ्यांना सहा टक्‍के कर्जरूपात अदा केले. त्यापैकी 30 लाख 83 हजार 944 रुपयांची कृषी पणन मंडळाने परिपूर्ती केल्याची माहिती पणन मंडळाने दिली. 


शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना आहे. बाजार समित्यांना योजनेसाठी पाच लाख अग्रिम देण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे शेतकरी व बाजार समित्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. 
- जी. सी. वाघ, उपसरव्यवस्थापक, कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com