marathwada mukti sangram din : पण उद्योगांत मागे!

७५ वर्षांत परभणी जिल्ह्याच्या भाळी मागासलेपणाचाच शिक्का; दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव
marathwada mukti sangram din
marathwada mukti sangram dinsakal

परभणी : दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या विस्तीर्ण खोऱ्यात वसलेला परभणी जिल्हा हा अनेक नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. काळी कसदार सुपीक जमीन व पुरेशी सिंचन व्यवस्था असतानाही केवळ उद्योगात प्रगती झालेली नसल्याने या जिल्ह्याच्या भाळी मागासलेपणाचा शिक्का आहे. राजकीय अनास्था, दूरदृष्टी आणि नियोजन शून्य कारभारामुळे अमृत महोत्सवी वर्षातही या जिल्ह्याच्या प्रगतीच्या विकासाचा रथ गती पकडताना दिसत नाही. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी सिंचन व कृषिपूरक उद्योगांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

उद्योगाअभावी जिल्ह्याची बाल्यावस्था

जिल्ह्यातील औद्योगिक विकास राज्याच्या निर्मितीनंतर ही बाल्यावस्थेत आहे. खनिजद्रव्य व नैसर्गिक साधनशूचितेच्या अभावामुळे मूलभूत जड उद्योग जिल्ह्यात स्थापन होऊ शकले नाहीत. मुंबई, पुणे, नाशिक या औद्योगिकदृष्ट्या विकसित केंद्रापासून जिल्हा दूर अंतरावर असल्याने साह्यभूत व इतर उद्योग परभणी जिल्ह्यात निर्माण झालेले नाहीत. परिणामी, उद्योगाअभावी या जिल्ह्याची अर्थव्यवस्था म्हणावी तशी गती घेऊ शकली नाही. परभणी जिल्ह्यात शेतीसोबत अन्य जोडव्यवसायावर भर दिल्यास दुग्ध व्यवसाय व भाजीपाला यांच्या उत्पादनात वाढ करण्याकरिता मुबलक साधनसामग्री उपलब्ध आहे.

शिक्षणात गुणवत्ता प्रगतीचा अभाव

स्वातंत्र्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात फारशी समाधानकारक स्थिती नव्हती. परंतु, अलीकडच्या काळात जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले आहेत. मोठ-मोठ्या शिक्षण संस्थांनी त्यांची महाविद्यालये, शाळा उभारल्या आहेत. खासगी शिक्षण संस्थाही अस्तित्वात असल्या तरी त्याकडे केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जात असल्याने शिक्षण क्षेत्राची दैनावस्था झाली आहे. जिल्ह्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासह जवळपास हजारो शाळा आहेत. शंभरच्या जवळपास महाविद्यालये आहेत. व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था आहेत. असे असले तरी जिल्ह्यात दर्जेदार शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे.

पर्यटनास वाव; कृती आराखड्याची गरज

परभणी केवळ जिल्ह्याचे ठिकाणच नाही तर या ठिकाणी नैसर्गिक निर्माण झालेले स्थळ, पुरातन मंदिरे व मशिदी असल्याने एक ऐतिहासिक ठेवाच या जिल्ह्याला मिळालेला आहे. यात जांभूळबेट, सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गा, श्रीक्षेत्र त्रिधारा, श्रीक्षेत्र पोखर्णीचे नृसिंह मंदिर, इंद्रायणी देवीचा माळ, नव्याने स्थापित झालेले श्री पारदेश्वर मंदिर, गंगाखेड येथे संत जनाबाईचे जन्मस्थळ, राणीसावरगाव येथील श्री रेणुकामाता मंदिर, पाथरीतील श्री साईबाबा जन्मस्थळ, यादवकालीन शिल्पकलेने नटलेले जिंतूर तालुक्यातील चारठाणा गाव, येलदरी धरण याचा समावेश करता येईल. परंतु जिल्हयात धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांचा विकास कृती आराखडा तयार निधई उपलब्ध झाल्यास पर्यटनाद्वारे विकासाला संजीवनी मिळू शकते.

कृषिकांच्या कर्मभूमीत कृषीपूरक उद्योगांची वाणवा

परभणी जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ६५ टक्के लोक हे शेतीवर अंलबून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांची नितांत गरज आहे. जिल्ह्यात सिंचनाची अन्य जिल्ह्यापेक्षा अधिकच्या सुविधा आहेत. उद्योगीकरणात जिल्हा फारशी गती घेऊ न शकल्याने सिंचनाची उपलब्धता असतानाही फळे व भाजीपाला उत्पादनात उच्चांकी वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील कृषी उत्पादन विचारात घेता संभाव्य उद्योग उभारणे, फळावर प्रक्रिया करणारे उद्योगास या जिल्ह्यात वाव आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील आर्थिक सुबतत्ता वाढवून या जिल्ह्यातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

आरोग्यक्षेत्रासाठी खूप कामांची गरज

मराठवाड्यातील मोठ्या रुग्णालयापैकी मोठे शासकीय रुग्णालय परभणीत आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाते. परंतु, जाळे विणलेले असतानाही केवळ आरोग्य विभागातील प्रगत तंत्रज्ञान व प्रशिक्षित डॉक्टर्स व परिचारिकांची रिक्त पदे यामुळे या जिल्ह्यात आरोग्य सेवा म्हणावी तशी प्रभावी नाही. या ठिकाणी खासगी दवाखाने असले तरी ते त्या पद्धतीने प्रगत नसल्याचे दिसते. यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

परभणी जिल्हा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असा जिल्हा आहे. हा जिल्हा गोदावरी, पूर्णा, दुधना या प्रमुख नद्यांनी वेढलेला आहे. जिंतूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर येलदरी धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ९११ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. तसेच जायकवाडी, ऊर्ध्व पैनगंगा व सिद्धेश्वर या स्रोतामार्फत बहुतांश सिंचनाच्या सुविधा आहेत. सेलू तालुक्यातील दुधनानदीवर निम्न दुधना प्रकल्प उभारला गेला आहे. गंगाखेड आणि जिंतूर हा डोंगराळ भाग आहे. येथे बंधारे व वनतलाव उभारण्यास वाव आहे. परभणी जिल्ह्यात पायाभूत किंवा आधारभूत संरचना मजबूत करण्यासाठी इतर जिल्ह्यांशी जोडणारे रस्ते मजबूत होताना दिसत आहेत. या रस्त्याद्वारे आता औद्योगिक विकासाला संजीवनी मिळण्याचे स्वप्न जिल्ह्यातील उद्योजक पाहत आहेत. परंतु, असे असले तरी जिल्ह्यातील राजकीय लोकांची अनास्था, प्रशासकीय दूरदृष्टी नसल्याने हा जिल्हा उद्योग व विकासाच्या बाबतीत बाळसे धरू शकलेला नाही ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे.

अतुल सावे यांच्या हस्ते आज ध्वजवंदन

परभणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त येथील राजगोपालचारी उद्यानात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शनिवारी (ता. १७) ध्वजवंदन होणार आहे. ता. १६ व १७ सप्टेंबरला सहकार मंत्री सावे हे जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ८.४० वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथून राजगोपालचारी उद्यान येथे प्रयाण करतील. सकाळी ८.४५ वाजता राजगोपालचारी उद्यान येथे आगमन. सकाळी ९.०० वाजता मराठवाडा मुक्ती संग्रामदिन ध्वजवंदनाकरिता उपस्थित राहतील. सकाळी ९.१० ते ९.२० स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान त्यांची वीर शौर्य पत्नी, वारस व उपस्थितीत नागरिकांची भेट घेतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com