मीरा एखंडे मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवा; पतीची पोलिसांत तक्रार

माजलगाव - मीरा एखंडे यांच्या सात मुली.
माजलगाव - मीरा एखंडे यांच्या सात मुली.

बीड/माजलगाव - मुलाच्या आशेपोटी सहा मुलींनंतर सातव्यांदा माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या मीरा एखंडे यांचा शनिवारी रात्री (ता.२९) मृत्यू झाला. पती रामेश्वर भगवान एखंडे यांनी याप्रकरणी मंगळवारी (ता.एक) पत्नीच्या मृत्यूस डॉक्‍टर व नर्स जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शहर पोलिसात केली आहे.

माजलगावातील जिजामातानगर भागात रामेश्वर एखंडे हे पत्नी मीरा व सात मुलींसह राहतात. मीरा यांना २८ डिसेंबरला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता बाळासह त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती रामेश्वर यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे, की मीराच्या नियमित तपासण्या केल्या. खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली असता चांगला अहवाल मिळाला. ग्रामीण रुग्णालयात २८ डिसेंबरला दाखल केले असता पत्नीला दुपारी चारला प्रसुतिगृहात नेण्यात आले. तेव्हा तिची प्रकृती ठीक होती. डॉक्‍टर तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ हजर नव्हते. बाळाचे वजन जास्त असल्याने रक्तस्राव होण्याची शक्‍यता असतानाही मीराचा रक्तगट, हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली नाही. उपचारादरम्यान रक्तस्राव चालू असताना रक्त दिले नाही. रक्त दिल्याचे खोटे सांगितले गेले. डॉक्‍टर व नर्स यांनी प्रसूतीदरम्यान निष्काळजीपणा दाखविला. सिझेरियन- शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असतानाही केली नाही.

त्यानंतर रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास ‘तुमच्या पत्नीला बीड येथे रेफर करायचे आहे’ असे सांगून कागदावर सह्या घेतल्या व लगेच पाच ते दहा मिनिटांत ‘तुमची पत्नी व बाळ दोघेही मृत झाले आहेत, असा आरोप रामेश्‍वर एखंडे यांनी तक्रार अर्जात केला आहे.

मीरा एखंडे यांची गर्भपिशवी नाजूक झाली होती. त्यामुळे अतिरक्तस्राव झाला. प्रसूतीसाठी शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञाला पाचारण करीत प्रसूती केली. रक्तस्राव झाल्याने रक्तही देण्यात आले; परंतु उपचारादरम्यान महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला. 
- डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव 

सात मुलींच्या मातृत्वाचे छत्र हरपले
बीड - आधीच्या सात मुलींचा जन्म व नंतर दोनदा अबॉर्शन झाल्यानंतर दहाव्यांदा गर्भवती असलेल्या मीरा एखंडे यांच्या मृत्यूने सात मुलींच्या डोक्‍यावरील मातृत्वाचे छत हिरावले आहे. प्रसूतीनंतर गर्भपिशवी आकुंचन पावली नाही. त्यामुळे रक्तस्राव न थांबल्याने मीरा यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष आरोग्य समितीने काढला आहे. मीरा या दहाव्यांदा गर्भवती होत्या. चार किलोचे बाळ जन्माला आले. बाळाच्या जन्मानंतर गर्भाशयाची पिशवी नैसर्गिक आकुंचित पावते. मात्र, तसे न झाल्याने रक्तस्राव सुरूच होता. या प्रकरणात दोन मतप्रवाह असले तरी मीरा यांच्या मृत्यूने त्यांच्या सात मुलींच्या डोक्‍यावरील मातृत्वाचे छत कायमचे हिरावले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com