जयंत पाटलांकडून मराठवाड्याची क्रूर चेष्टा - आमदार सुरेश धस

घाईगडबडीत मंजूर केलेल्या खुंटेफळ साठवण तलावाच्या निविदेवरच घेतला आक्षेप
MLA Suresh Dhas statement Jayant patil Cruel Joke on Marathwada Ashti
MLA Suresh Dhas statement Jayant patil Cruel Joke on Marathwada Ashtisakal

आष्टी : खुंटेफळ साठवण तलाव हा आष्टी मतदारसंघासाठी सर्वात महत्त्वाकांशी प्रकल्प असून 1100 कोटी रुपयाच्या कामाची मी मंजुरी आणली होती. त्यातून 200 कोटी रुपयांची कामे देखील झाली आहेत. मागील अडीच वर्षात या तलावाच्या कामासाठी एक इंच जमीन संपादित झाली नाही. तलाव पुर्ण नसताना पाईपलाईन कामांची घाईगडबड कशासाठी? मावळते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या 1468 कोटीच्या पाईपलाईनच्या कामाला मंजुरी आणि निविदा काढण्याची परवानगी दिली कशी? तसेच सरकार पडत असताना घाईघाईने मंजुरी निविदा प्रसिद्ध करून गैरप्रकार करून पाटील यांनी मराठवाड्याची क्रूर चेष्टा केली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली.

खुंटेफळ तलावाच्या सुधारीत 1468 कोटींच्या मंजुरीला स्थगिती द्यावी, अशी मागणी आ. धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र देऊन केली. त्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली. याविरोधात मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन धसांवर जोरदार टीकास्त्र सोडले. या पार्श्वभूमीवर आ. धस यांनी सायंकाळी आपल्या अद्वैतचंद्र या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

आ. धस म्हणाले की, आता खुंटेफळ प्रकल्पाच्या कामांना 1997 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याची आवश्यकता असून किमान तीनशे कोटी रुपये निधी मंजूर करणे आवश्यक असताना दिनांक 26 जूनला निविदा आणि 30 जूनला प्रसिद्धी या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे-उपमुख्यमंत्र्याकडे करणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी देखील आपण ठेवली आहे. खुंटेफळ साठवण तलावाचे 27 हजार 767 हेक्टर लाभ सिंचन क्षेत्र आहे. जवळपास दोनशे गावांना सिंचन सुविधा मिळणार आहेत. आम्ही जनसुनावणी घेतली 500 एकर भूसंपादनाची

आवश्यकता असताना तुम्ही अडीच वर्षात पाच गुंठे तरी भूसंपादन केले का? असे सांगून आमदार धस पुढे म्हणाले की, या तलावासाठी मी दगडगोटे खाल्लेले आहेत. हा तलाव होऊ शकत नाही असे हेच आजचे विरोधक म्हणत होते. आजबे आमदार झाल्यापासून साठवण तलावाचे काम सोडून दुसऱ्याच कामात व्यस्त होते. विकास कामांचे नियोजन करण्याऐवजी मला आणि माझ्या कुटुंबीयांना गुन्हेगारी खटल्यात अडकवण्याचे षड्यंत्र करण्यात व्यस्त होते. माहिती अधिकार कार्यकर्ते, राॅकेल टाकणारे, तक्रारखोर कार्यकर्त्यांचे कोंडाळे जवळ ठेवून त्यांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला. माझ्याविरुद्ध खोटे-नाटे गुन्हे दाखल झाले. परंतु त्यांच्याच शासनाच्या काळामध्ये सदरील गुन्हे हे डीवायएसपींना पुरावे सापडले नसल्यामुळे थांबवण्यात आलेले आहेत. उलट आजबे हे आष्टी नगरपंचायतीच्या विकास कामात अडचणी आणत होते.

त्यांनी तक्रारी केलेली घमेलेभर पत्रे माझ्याकडे आहेत. पण जनतेने त्यांना नगरपंचायत निवडणुकीत जागा दाखवून दिली आहे. अगदी अर्धे मंत्रिमंडळ देखील त्यांनी निवडणुकीमध्ये आणले होते. परंतु तीनही ठिकाणी मिळून त्यांना चार ते पाच जागा मिळाल्या आहेत. आमदार आजबे यांनी एसआयटी स्थापन केल्या. परंतु नवाब मलिक जेलमध्ये गेले आहेत. माझी मालमत्ता 1000 कोटीची आहे असे ते सांगत होते. परंतु माझी मालमत्ता पन्नास कोटींची सुद्धा कधीच नव्हती. माझ्याविरुद्ध विशेष तपास पथक यंत्रणा लावली. आ. आजबेंचा विकास कामाचा नमुना म्हणजे हायमॅक्स. त्यांनी हे दिवे अनेक ठिकाणी लावले. परंतु त्यातला एक तरी आहे चालू असलेला मला त्यांनी दाखवून द्यावा, अशी टीकाही धस यांनी केली.

केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी आम्ही मिळविली खुंटेफळ साठवण तलावाला केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी नव्हती. त्यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि नितीन गडकरी यांच्यासमवेत आपण प्रयत्न केले. त्यावेळी केंद्र शासनाने पन्नास हजार हेक्टरपर्यंतच्या प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीचे राज्यांनाच अधिकार दिले. त्यामुळे हा प्रश्न सुटला, असे सांगून आ. धस म्हणाले की, आजबे हे पात्रता नसताना आमदार झालेले आहेत. अडीच वर्षात त्यांनी फक्त स्वतःचेच घर भरले आहे. सार्वजनिक कामाकडे त्यांचे कधीच लक्ष नव्हते. माझ्यावर देवस्थान जमिनीचा आरोप करताना त्यांनी स्वतःकडे पाहणे आवश्यक होते. दादेगाव येथील श्रीराम देवस्थानाची सातशे एकर जमीन आहे. त्यातली साडेतीनशे एकर जमीन कोण वापरते तसेच इनामी जमिनीत कोणाकोणाचे पेट्रोल पंप आहेत, कोणाचे मंगल कार्यालये आहेत, कोणाचे खडीक्रेशर आहे, कोणाच्या शाळा आहेत या सर्व कागदपत्रांची जमवाजमव मी करीत आहे.

मी कीड असेल तर आ. आजबे झुरळ...

विकासकामांना विरोध करणारे आ. धस हे मतदारसंघाला लागलेली कीड आहेत, अशी टीका आ. आजबेंनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आ. धस म्हणाले की, मी विकास कामांमधील कीड असेल तर बाळासाहेब झुरळ आहेत. ते झुरळासारखे आले आणि झुरळासारखेच जातील. मी त्याकडे लक्ष देणार नाही. माझ्यावर टीका हे त्यांचे रोजचे धंदे झाले आहेत. माझ्या 19 वर्षाच्या आमदारकीच्या काळात अशा प्रकारे घाईगडबडीत निर्णय झाल्याचे मी पाहिले नव्हते. या फसव्या आणि खोट्या निविदा काढल्याबद्दल जयंत पाटील यांच्या गैरप्रकाराची चौकशी मागणी करणार आहे. असेही धस म्हणाले.

...तर आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार

मी शेतकऱ्यांना जमिनी देऊ नका असे म्हणाल्याचे सिद्ध करून दिल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान देऊन आ. धस म्हणाले की, खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाच्या मंजुरीची बॅनरबाजी मतदारसंघात करून आमदार आजबे यांनी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. खुंटेफळ साठवण तलावाचे पाईपलाईनचे काम आम्ही करणारच आहोत. अशा प्रकारची कामे फक्त सुरेश धस हेच करू शकतात हा जनतेलाही विश्वास आहे, असेही धस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com