बीड - भारत हा महिलांसाठी असुरक्षित देश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "महिला सेफ्टी ऑडिट' हा उपक्रम सुरू केला आहे. मराठवाड्यातील या उपक्रमाची सुरवात बुधवारी (ता. 11) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते बीडमधून झाली.
महिला सुरक्षेबाबत 35 कायदे असले तरी पोलिसांकडून कडक अंमलबजावणी होत नसल्याने महिलांवरील अन्याय- अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. या उपक्रमातून महाराष्ट्र हिंसाचारमुक्त होण्यास मदत होईल. गाव आणि शहरांतील काही भागांत ठराविक ठिकाणी महिला, युवती आणि शालेय विद्यार्थिनींची छेडछाड होत असते. या उपक्रमात अशी ठिकाणे शोधून त्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक, या ठिकाणी पथदिवे बसवून छेडछाड रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपक्रमात कुठलेही राजकारण नसल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला.
राज्यात प्रत्येक दिवशी 12 महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. नुसत्याच "बेटी बचाव बेटी पढाव'च्या गप्पा मारल्या जात असून, उत्तर प्रदेशातील घटना पाहता सत्ताधाऱ्यांपासून बेटी बचाव म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. बीडमधील एका आमदारावर बलात्काराचा आरोप होऊनही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. त्याबाबत उच्च न्यायालयात खटला दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. "रामराज्य' म्हटले जात असले तरी "रावणराज्या'पेक्षा वाईट अवस्था झाल्याचा आरोप करून गृहखाते सांभाळणाऱ्याची मानसिकता महत्त्वाची असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
|