कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाऊन काळाची गरज - खासदार चिखलीकर

खासदार प्रताप पाटील चिखलीकर
खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड - जगभरात कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. परंतू कोरोनापासून वाचायचे असेल तर घरात राहणेच महत्वाचे आहे. त्याशिवाय तूर्त तरी दुसरा उपाय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर देशांची परिस्थिती लक्षात घेऊनच संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच देशावरील फार मोठे संकट टळले आहे. त्यामुळे लॉकडाऊन ही काळाची गरज असल्याचे मत नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लावण्यात आलेला लॉकडाऊन ता. १४ एप्रिलला संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात लॉकडाऊन ठेवावा की शिथिल करावा, याबाबत विचारले असता खासदार चिखलीकर यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय देशाच्या हिताचा ठरला. लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला नाही आणि अनेक जीव वाचले. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना थोडा फार त्रास सहन करावा लागला पण तो एका अर्थाने चांगलाच निर्णय झाला. 

इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली
आज अमेरिका, इटली, स्पेन, चीन आदी देशांचे परिस्थिती पाहता भारतातील परिस्थिती लॉकडाऊनमुळे खूपच चांगली राहिली असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले. लॉकडाऊनचा कालावधी ता. १४ एप्रिलला संपणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या संदर्भातील आकडेवारी पाहिली तर देशाची परिस्थिती बरी असली तरी महाराष्ट्राची मात्र चिंताजनक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सांगली, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या ता. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवला पाहिजे, असे मतही खासदार चिखलीकर यांनी व्यक्त केले. 

नांदेडला चांगली परिस्थिती
नांदेडला सुदैवाने अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही, ही चांगली बाब आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. खासदार या नात्याने मी देखील शहर आणि जिल्ह्यातील तालुक्यांना आणि गावांना भेटी देऊन जी मदत करणे शक्य आहे ती केली. पोलिसांना मास्क तसेच सॅनिटायझर तसेच गोरगरिब आणि गरजूंना अन्नधान्य वाटपाचे काम सुरु आहे. गरजवंतांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वाटप केले असून जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, आरोग्य, पोलीस प्रशासनाच्या कामाची प्रशंसा तर केलीच पण त्यांना मास्क व सेनिटायझर वाटप केले. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद, देगलूर तालुक्यातील मरखेल, गोजेगाव, माळेगाव, नायगाव तालुक्यातील नरसी, नरसी तांडा, बिलोली मधील किनाळा या गावांना भेटी दिल्या आहेत. 

एकदम मोकळीक नको 
सध्या शेतीची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी मी पाहणी केली असता शेतकरी सोशल डिस्टिन्सिंग पाळून काम करत असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्याविषयी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याशी चर्चा झाली आहे. नांगरणी किंवा इतर कामासाठी टॅक्टरला डिझेल देण्याविषयी तसेच त्यांना सांगितले आहे. शेतातील कामे सोशल डिस्टिन्सिंग पाळून होत असतील तर करु द्यावीत, असे माझे मत आहे. त्याचबरोबर उद्योग, व्यापार या दृष्टीने देखील ज्या ठिकाणी कोरोनाचा अजिबात प्रार्दुभाव नाही त्या ठिकाणी थोडी फार सवलत शिथिलता दिली पाहिजे, असे मला वाटते. एकदम मोकळीक नको पण त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून प्रशासनाने निर्णय घ्यायला हरकत नाही. पण नागरिकांनी देखील सहकार्याची भूमिका ठेवणे तितकेच आवश्‍यक आणि नितांत गरजेचे आहे. कारण लॉकडाऊन ही काळाची गरज आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com