पन्नास हजार वंचितांना मिळणार स्वस्त धान्य 

File photo
File photo

लातूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना शोधून त्यांना धान्याचा लाभ मंजूर करण्यासाठी राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान हाती घेतले होते. अभियानाच्या महिनाभराच्या काळात जिल्ह्यात पन्नास हजार वंचित लाभार्थींना शोधून त्यांना धान्याचा लाभ मंजूर करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. पुढील महिन्यापासून या लाभार्थींना धान्य मिळणार असून आणखी 23 हजार लाभार्थींना धान्याचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. 

मागील काही वर्षात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठी पारदर्शकता आली असून, आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या पॉज मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना (रेशनकार्डधारक) स्वस्त धान्याचे वितरण केले जात आहे. यात अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींचा समावेश आहे. पुरवठा विभागाकडून पात्र कुटुंबांना नवीन रेशनकार्ड देऊन स्वस्त धान्याचा लाभ देण्याचे काम नियमित सुरू आहे. मात्र, अनेक लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित होते. यात अनेक कुटुंबांकडे रेशनकार्डही नव्हते. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानातून अशा वंचित लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जुलै ते 15 ऑगस्टदरम्यान अभियान राबवत स्वस्त धान्य दुकानदारांनी वंचित लाभार्थींचा शोध घेतला. या लाभार्थींना नवीन रेशनकार्ड मंजूर करण्यासोबत त्यांची व कुटुंबांतील सदस्यांची माहिती ऑनलाइन भरण्यात आली. यामुळे पुढील महिन्यापासून सर्व लाभार्थींना स्वस्त धान्याचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र चोबे यांनी सांगितले. उद्दिष्टापैकी उर्वरित अंत्योदय योजनेतील 292 तर अन्नसुरक्षा योजनेतील 22 हजार 837 लाभार्थींचा शोध पूर्ण झाला असून, या लाभार्थींची माहिती दहा दिवसांत ऑनलाइन भरून त्यांना स्वस्त धान्याचा लाभ देण्याचे नियोजन असल्याचे श्री. चोबे यांनी सांगितले. 

जिल्ह्याची राज्यात आघाडी 
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा जिल्हा असल्याने अभियानातून वंचित लाभार्थींचा प्रभावी शोध घेण्यात आला. शोधाचे काम वेगाने करून लाभार्थींची माहिती तातडीने ऑनलाइन भरण्यात आली. यामुळे अभियान कालावधीत लाभार्थींचा शोध घेऊन तब्बल 49 हजार 985 लाभार्थींना धान्याचा लाभ मंजूर करून लातूर जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे श्री. चोबे यांनी सांगितले. अभियानात अंत्योदय योजनेतील एक हजार 764 कुटुंबांना नवीन रेशनकार्ड देण्यात आले. या कुटुंबांतील सहा हजार 460 सदस्यांना धान्याचा लाभ मिळणार आहे. अन्नसुरक्षा योजनेतून बारा हजार 561 कुटुंबांना नवीन रेशनकार्ड देण्यात आले असून, या कुटुंबांतील 43 हजार 262 सदस्यांना स्वस्त धान्य मिळणार असल्याचे चोबे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com