कळंबकरांना महिन्यातून दोन वेळाच मिळणार पाणी

File photo
File photo

कळंब (जि. उस्मानाबाद) ः पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही तालुकावासीयांची दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जोरदार पाऊस न झाल्यामुळे कळंब शहरासह अन्य शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा असल्याने या प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची शक्‍यता आहे. टॅंकरने पाणी घेण्याचा इशारा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे कळंब नगरपालिकेने शहरात दवंडी देऊन यापुढे पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. 


यंदा कळंब तालुक्‍यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी व नाले अद्याप कोरडे आहेत. पावसाळा सुरू होऊन सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, पावसाअभावी तालुक्‍यातील सर्व सिंचन प्रकल्पांसह मांजरा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कोणतीही वाढ झाली नाही. या प्रकल्पातून लातूर व एमआयडीसी, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई आदी शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यःस्थितीत प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. तालुक्‍यातील सर्व सिंचन प्रकल्पांत पाणीसाठा नसल्याने आगामी काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे.

मांजरा प्रकल्पातून केज, धारूर आदी शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी उपसा करणारे एक्‍स्प्रेस फिडर असल्याने पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. कळंब पालिकेकडे एक्‍स्प्रेस फिडरची सुविधा नसल्याने मनुष्यबळावरच कळंबचा पाणीपुरवठा अवंलूबन आहे. प्रकल्पातील अत्यल्प जलसाठ्यामुळे शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मांजरा प्रकल्पाच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाला तरच मांजरा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होऊ शकते. मांजरा धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या संबंधित शहराच्या पालिका मुख्यधिकाऱ्यांसोबत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. पाणीसाठा शून्य टक्‍क्‍यावर पोचल्याने यापुढे धरणातून टॅंकरद्वारे पाणी घेत जलशुद्धीकरण केंद्रात टाकावे हा एकमेव पर्याय असून, तसे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नोटीस काढून पंधरा दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे दवंडीद्वारे सूचित करण्यात आले आहे. 

मुसळधार पावसाची प्रतीक्षा 
तालुक्‍यात दमदार पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र प्रमाणात भेडसावत आहे. पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. तालुक्‍यातील 19 गावांना 26 टॅंकर, तर 57 गावांना 119 अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यासह पाणीटंचाईने त्रस्त असलेली गावे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com