कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारला सहकार्य करा

आमदार राणाजगजितसिंह पाटील
आमदार राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद : कोरोना रोखण्यासाठी सरकारतर्फे सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा, बाहेर जाताना मास्कचा अथवा रूमालाचा वापर अवश्य करा, अनावश्यक कारणासाठी गर्दी करू नका, कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

या संदर्भात आमदार पाटील यांनी सोमवारी (ता. ३०) प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाचा केंद्रबिंदू म्हणून चीनकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. तेथील जनजीवन आता सुरळीत होत आहे. तेथील सरकारने घालून दिलेले सर्व निर्बंध काटेकोरपणे अंमलात आणल्यामुळेच चीनमधील परिस्थिती आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे. आपणही केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे. काही काळ या सर्व बाबी जाचक वाटल्या तरी त्या मोठ्या प्रमाणात पाळायलाच हव्यात. तरच आपणही चीनप्रमाणे लवकरच पूर्वपदावर येऊ, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

चीनमधील जनजीवन आता सुरळीत होत आहे. हॉटेल, दुकाने, सरकारी, खासगी कार्यालये व अन्य व्यावसायिक ठिकाणे आता सुरू झाली आहेत. कंपन्यांनी ही आपले उत्पादन सुरु केले आहे. पुन्हा एकदा रस्ते गजबजून गेले असून जीवन काही निर्बंधांसह पूर्वपदावर येत आहे.

चीनमधील हुबेई प्रांत व त्याची राजधानी असलेले वुहान शहर हे कोरोनाच्या संसर्गाने सर्वात जास्त बाधित झालेले व मनुष्यहानी झालेली ठिकाणे आहेत. मात्र आता त्या हुबेई प्रांतातील साथ आटोक्यात आल्याने चीन सरकारने प्रवासबंदी २५ मार्चला उठवली असून वुहान शहरातील संपूर्ण बंदी आठ एप्रिलला उठवण्यात येणार आहे. जगभर थैमान घातलेल्या या कोरोना विषाणूची जिथे सुरवात झाली. तेथील जनजीवन इतक्या लवकर कशामुळे सुरळीत झाले असावे, हजारोंच्या संख्येने जीव गमवावा लागलेल्या भागात साथ नियंत्रणात येऊन कारखाने, हॉटेल, कार्यालये कशी काय सुरू झाली असतील. याचे उत्तर आहे साथ नियंत्रणात आणण्यासाठी त्या सरकारने जे कठोर निर्बंध घालून दिले, त्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले.

चीनप्रमाणे आपल्याकडेही हॉटेल, दुकाने, कारखाने आदी सुरू करणे शक्य होईल, त्यांच्यासारखे कमी कालावधीत जीवन पूर्वपदावर आणता येईल, मात्र त्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. आपणही चिनी नागरिकांप्रमाणे सरकारने केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपला देशही कोरोनामुळे अभूतपूर्व अशा संकटात सापडला आहे. यावर मात करण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार योग्य ती पावले उचलत आहेत.

ज्या पद्धतीने चीनमधील नागरिकांनी सरकारने आखलेले सर्व निर्बंध कठोर असले तरी त्यांचे पालन केले, त्याच पद्धतीने आपण जर सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले, घरी बसून साथ आटोक्यात आणायला मदत केली तर निश्चितच आपण चीनपेक्षा अधिक लवकर यातून बाहेर पडू व आपले जनजीवनही चीनप्रमाणे काही निर्बंधांसह सुरळीत होईल. त्यासाठी सरकारतर्फे सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे, या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार थांबवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com