उस्मानाबाद : आत्तापर्यंत २२९ शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पंचनामे

File photo
File photo

उस्मानाबाद : पेरणीनंतर आठ ते दहा दिवस उलटूनही सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६६३ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. कृषी विभागानेही तक्रारींनुसार पंचनामे सुरू केले असून, आतापर्यंत २२९ शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करण्यात आले आहेत.

जिल्ह्याच्या बहुतांश भागांत यंदा मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली. यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाख पाच हजार हेक्टरवर म्हणजे जवळपास ६५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यानुसार कृषी विभागाने तयारीही केली.

दरम्यान, मृग नक्षत्रात पाऊस होताच शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. परंतु पेरणीनंतर आठ ते दहा दिवस झाले तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणेच उगवले नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केला आहे. बियाणे, खतासाठी पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र सोयाबीनचे बियाणेच उगवले नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांची मेहनत आणि बियाणे व खताचा खर्च वाया गेला.

बियाणाची उगवण झाली नसल्याची चर्चा गावोगावी सुरू झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करण्यास सुरवात केली आहे. कृषिमंत्री दादा भुसे तीन दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी काही गावांतील शेतात जाऊन पाहणीही केली.

मृग नक्षत्रातच दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली. परंतु अनेक ठिकाणी उगवणच होत नसल्याने शेतकरी हतबल झाले. अतिवृष्टीने किंवा पावसाअभावी वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे जिल्ह्यात यापूर्वी करण्यात आले. परंतु बहुतांश ठिकाणी पेरणी करूनही बियाण्यांची उगवणच झाली नसल्याच्या ठिकाणचे मोठ्या संख्येने पंचनामे करण्याची वेळ कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता आली आहे. 

दरम्यान, पेरणी करून सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याबद्दल जिल्ह्यातून ६६३ शेतकऱ्यांच्या तक्रारी गुरुवारी (ता. २५) दुपारपर्यंत कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या असून, त्यापैकी २२९ शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. यू. मंगरूळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट 
हजारो रुपये खर्च करीत गेल्या महिनाभरापासून शेतीत मेहनत करूनही पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे हा खर्च व मेहनत वाया गेली आहे. आता दुबार पेरणीशिवाय या शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिला नाही. मात्र पेरणीसाठी पुन्हा पैशांची जुळवाजुळव कशी करावी, याची चिंता अनेक शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे व खतांचा मोफत पुरवठा सरकारने करावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com