अधिकाऱ्यांनी चौकशीच रेंगाळत ठेवली?

File photo
File photo

उस्मानाबाद : सव्वासहा कोटी रुपयांच्या पुस्तक घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांसह काही प्रमुख अधिकाऱ्यांचेही हात अडकल्याने चौकशीची प्रक्रिया जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवली जात असल्याचा आरोप शेतकरीवर्गातून होत आहे. सव्वासहा कोटींचा निधी बनावट खात्यावर की संस्थेच्या खात्यावर वर्ग झाला? याची खमंग चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू झाली आहे.

बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सव्वासहा कोटी रुपयांचा निधी आला होता. तत्कालीन एका मंत्र्याच्या आदेशाने सव्वासहा कोटी रुपयांचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले. जेव्हा एखादे काम नियमबाह्य होते. तेव्हा त्याची माहिती संबंधित मंत्री, राजकीय पुढाऱ्यांना सांगण्याची जबाबदारी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची असते; मात्र अधिकाऱ्यांनीच मलिदा लाटल्याने राजकीय नेते; तसेच कंत्राटदाराने बळीराजासाठी आलेल्या पैशांवर डल्ला मारल्याचे निदर्शनास आले.

जिल्ह्यातील त्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे जीवन उंचाविण्यासाठी हा निधी खर्च करणे अपेक्षित होते; मात्र हा पैसा थेट एका संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला आहे. संस्थेचा आडपडदा करीत सव्वासहा कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली असून, अंगठेबहाद्दर शेतकऱ्यांनाही पाच-पाच हजार रुपयांची पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली असल्याचे चित्र आहे. 

‘सकाळ’चा पाठपुरावा 
‘सकाळ'ने हे प्रकरण प्रथम उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे.

१५ दिवसांत चौकशी पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र कोरोनाच्या लॉकडाउनचे कारण पुढे करीत चौकशीची प्रक्रिया रेंगाळत ठेवली आहे. संबंधित संस्थेने अद्यापही पुरेशी माहिती दिली नसल्याचे बोलले जात आहे. 

खातेच बनावट? 
ज्या संस्थेला हे पुस्तकाचे काम देण्यात आले आहे त्या प्रमुख संस्थेऐवजी बनावट संस्था दाखवून तिसऱ्याच संस्थेच्या खात्यावर निधी वर्ग झाल्याची चर्चा शेतकरीवर्गात होत आहे.

विशेष म्हणजे एखाद्या नेत्याचा सांगण्यावरून सव्वासहा कोटी रुपयांचे काम एका संस्थेला देण्यात आल्याने संबंधित नेताही तेवढाच जबाबदार असल्याची चर्चा शेतकरीवर्गात होत आहे. त्याला साहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही यात मलिदा लाटल्याने चौकशी रेंगाळत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com