अपुऱ्या पावसाने उसाचे क्षेत्र मोडीत

केसरजवळगा (ता. उमरगा) ः भरपावसाळ्यात तळ गाठलेला साठवण तलाव.
केसरजवळगा (ता. उमरगा) ः भरपावसाळ्यात तळ गाठलेला साठवण तलाव.

केसरजवळगा (जि.उस्मानाबाद) ः कृष्णा खोरे साठवण तलाव क्रमांक (एक) परिसरात गेल्या पाच वर्षांपासून सतत अपुरा पाऊस होत असल्याने परिसरातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी शेकडो एकर उसाचे क्षेत्र मोडीत काढले आहे. आता या शेतकऱ्यांनी हंगामी पिके घेण्यावर भर दिला आहे. येथील साठवण तलावाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच भरपावसाळ्यात तलाव कोरडा पडल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागण्याची दाट शक्‍यता आहे.

 
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात येथे दोन साठवण तलावांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे सिंचनाची सोय झाल्यामुळे गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न मिटला. तलाव परिसरातील अनेक कोरडवाहू शेतकरी बागायतदार झाले. अनेकांनी उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. गेली 20 वर्षे उसाचे पीक घेणारे शेतकरी आता हंगामी पिकांकडे वळले आहेत. साठवण तलाव परिसरात गेल्या पाच वर्षांपासून सतत अपुरा पाऊस होत असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळीत घट होत गेली. केसरजवळगा परिसरात कृष्णा खोरेचे दोन तलाव व एक पाझर तलाव आहे. गावातील तिन्ही तलाव भरपावसाळ्यात कोरडे पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या अधिग्रहण केलेल्या दोन कूपनलिका व साठवण तलावाखालील विहिरीतून नळयोजनेद्वारे पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

आगामी काळात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्‍यता आहे. गेल्या पाच वर्षांपासून तलाव डिसेंबर किंवा जानेवारीतच कोरडे पडत असल्याने उसाला वेळेवर पाणी मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाकडून ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पाणीसाठा आरक्षित केला जात असे. पिकापेक्षा ग्रामस्थांना पाणी मिळणे महत्त्वाचे असल्याने साठवण तलाव परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र मोडीत काढत हंगामी पिके घेण्याला प्राधान्य दिले आहे. शिवाय परिसरात गेल्या दहा वर्षांपासून अपुरा पाऊस होत असल्याने पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास पाचशे फूट खोल कूपनलिका खोदल्या तरी कूपनलिकेला पाणी लागत नसल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला. गेल्या 25 वर्षांतील सर्वात गंभीर परिस्थिती यावर्षी शेतकरी अनुभवत आहेत. साठवण तलाव परिसरातील शेती खडकाळ आहे. जमिनीही साध्या असल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मूग, तूर पीक करपले आहे. प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना होणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com