World Alzheimer's Day : चौघांतील एकाला स्मृतिभ्रंश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - घाटी रुग्णालयात गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये वार्धक्‍यशास्त्र विभागाने मेमरी क्‍लिनिक सुरू केले. त्यात विसराळूपणासाठी झालेल्या 3,700 लोकांच्या स्क्रीनिंगमध्ये 170 रुग्णांना स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण साडेचार टक्के असून, त्यातील काहींना आजार, शारीरिक व्याधी, लकव्यामुळे स्मृतिभ्रंश झाला तर उर्वरित लोकांना अल्झायमरने ग्रासले आहे. दर तीन ते चार जणांत एकाला या आजाराने ग्रासल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार तीन ते चार जणांमध्ये एकाला अल्झायमर आजाराला सामोरे जावे लागते. सध्या जगामध्ये पाच कोटी लोकांना, तर देशात दरवर्षी एक कोटी लोकांना हा आजार होतो. स्मरणशक्ती कमी होत वाढत जाणारा विसराळूपणा हा आजार आहे. त्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. वयोमान आणि अनुवांशिकता ही कारणे असली तरी
शारीरिक व्याधी, मधुमेह, रक्‍तदाबाच्या रुग्णांसह बदलती जीवनशैली, व्यसनाधीनताही त्याला कारणीभूत आहे. या आजारामुळे अनेक व्यक्ती परावलंबी होत असून, दैनंदिन व्यवहार करणेही त्यांना अशक्‍य होते. विस्मरण, भान कमी होणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे, त्यातून भ्रमिष्टपणा वाढण्याची लक्षणे दिसून येतात. पुढे-पुढे दैनंदिन व्यवहार,
खाणे-पिणे, स्वच्छता, कपडे, औषधी आदी विसरल्या जातात. रंगात वापरली जाणारी सॉल्वंट रसायने, मधुमेह, अतिरक्तदाब, धूम्रपान, जीवनसत्त्व बी-12 कमतरता, हे सर्व या आजाराला निमंत्रण देतात. आहारात फळे, भाजीपाला, मासे यांचे योग्य प्रमाण असल्यास काही प्रमाणात आजाराला प्रतिबंध होतो. शिवाय मेंदूला चेतना देणारे खेळ, संगीत, कार्यक्रमांत सहभाग
यांचीही प्रतिबंधाला मदत होते. 

अल्झायमर हा स्मृतिभ्रंशाचा (डिमेन्शिया) आजार आहे; मात्र त्यासंदर्भातही अनेक गैरसमज समाजात आढळतात. हा आजार पूर्णपणे बरा होणार नसला तरी औषधोपचाराने त्याची गती कमी करता येते. अनुवांशिक, वयामुळे झालेल्या अल्झायमरला टाळता येत नसले तरी इतर बाबतींत हेल्दी लाइफस्टाइल, सकस आहार, व्यायमासोबत, व्यसन व तणावमुक्त जगले तर आजार टाळता येऊ शकतो. मेंदूला चालना देणारे छंद जोपासा. भाषा, संगीत, कला, शब्दकोड्यांनी मेंदूला चालना द्या. 
- डॉ. प्रदीप देशमुख, मनोविकृतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी. 

मेंदूतील सूक्ष्म तंतू एकमेकांत गुंतून नॉर्मल पेशींएवजी मेंदूत सदोष प्रथिनांचे प्रमाण वाढत जाते. रक्तवाहिन्यांमध्ये थर जमतात. कार्यकुशलता, बुद्धिकौशल्ये कमी होतात. स्थळ, काळ, ओळखीचे भान हरपते. मेंदू आक्रसत जातो व अकार्यक्षम होत जातो. अल्झायमरग्रस्तांसाठी निश्‍चित वैद्यकीय औषधे अद्याप नाहीत. काही औषधांचा वापर केला जात असला तरी सिद्धता नाही. त्यावर संशोधन सुरू आहे. ज्येष्ठांना व्यायाम, मेंदूला चालना देण्याऱ्या गोष्टी, चर्चा करीत राहिल्यास मेंदू कार्यक्षम राहतो. पालेभाज्या, फळे, तेलकट तुपकट टाळा. 
- डॉ. मंगला बोरकर, वार्धक्‍यशास्त्र विभागप्रमुख, घाटी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com