रब्बीचा पेरा करण्यासाठी पैसे आणायचे कुठून, शेतकऱ्यांचा सवाल

रब्बीचा पेरा करण्यासाठी पैसे आणायचे कुठून, शेतकऱ्यांचा सवाल

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : परतीच्या पावसामुळे सोयाबीन, मका, पहिल्या वेचणीचा कापूस आदी पिके हातची गेली आहेत. शेतशिवारात सोयाबीनच्या जमा केलेल्या शेंगांच्या ठिकाणी हिरवीगार रोपटी तयार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाचा कहर बघता शेतकऱ्यांच्या हातची पिके गेल्यानंतर आता तो परत रब्बीच्या पेरणीच्या कामात गुंतला आहे; परंतु बियाणे, खते घ्यायची कशी? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे.

खरीप पिकांच्या विक्रीतूनच जुनी देणी देऊन रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकरी बियाणे, खते विकत घेत होते. गेल्या तीन वर्षांचा विचार करता मुबलक पाऊसच न झाल्यामुळे रब्बीचा पेऱ्यात मोठी घट झाली होती. मागील वर्षी तर रब्बीचा पेराच झाला नाही. आता परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले खरे; परंतु शेतशिवारातील विहिरींसह गावागावांतील पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. रब्बीच्या हंगामात शंभर टक्के पेरा होण्याची परिस्थिती आहे; परंतु खिशात दमडा नाही. पेरणी करावयाची कोठून? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. "देव देतो; पण कर्म नेते' अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असताना पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण करण्यात रब्बीच्या पेरणीची वेळ निघून जाण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे सरकार बनेल तेव्हा बनेल; परंतु प्रशासनाने आता निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.

पीकविमा भरण्यापासून मोबदला मिळेपर्यंत कसरती
गेल्यावर्षीपासून हवामानाच्या आधारावर पीकविमा देण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत. खरिपाची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी देखील मोठ्या कसरती कराव्या लागतात. पीकपेरा असलेला सातबारा घेणे किंवा पेरा प्रमाणपत्र घेणे म्हणजे दिव्य काम, त्यानंतर पीकविमा अर्ज ऑनलाइन करताना विमा कंपनीचे संकेतस्थळ कित्येक वेळेस बंदच राहत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कित्येकदा रात्री जागून महा-ई-सेवा केंद्रांवर अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. हे सर्व केल्यानंतरही आता पावसाने पिकांचे नुकसान झाले असताना पीकविमा भरण्यासाठी अर्ज करताना शेवटची तारीख गेल्यानंतर अर्ज स्वीकारले गेले नाहीत. तसे आता शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाल्यानंतर पीकविम्याचा मोबदला मिळण्यासाठी काही तारीख निश्‍चित का केली जात नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com