भारत घुसखोरांची धर्मशाळा नाही, अभिनेते साेलापूरकर यांचे मत

Actor Rahul Solapurkar, Latur City
Actor Rahul Solapurkar, Latur City

लातूर : नागरिकत्व सुधारणा कायदा हा शरणार्थी हिताचा असून घुसखोरांविरोधात कारवाई करणारा आहे. देशातील रहिवाशांचे या कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. जे नागरिक वर्षानुवर्षे या देशात राहत आहेत, त्यांना या कायद्यामुळे कसलाही धोका नाही. ज्यांनी घुसखोरी केलेली आहे त्यांना या कायद्यामुळे देश सोडावा लागेल, असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.

भारत विकास परिषदेच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयावर सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. परिषदेचे अध्यक्ष विश्वास लातूरकर, सचिव सुनील पाटील, कार्यक्रम प्रमुख सुधाकर जोशी, संतोष पाटील उपस्थित होते.


सोलापूरकर म्हणाले, हा कायदा कोणत्याही जाती-धर्माविरोधात नाही. भाजपाने २०१४ सालच्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात हा कायदा लागू करण्याचे वचन दिले होते. हा कायदा बेकायदेशीर असता तर त्याच्याविरोधात त्याचवेळी तक्रार करता आली असती. पण अशी तक्रार कोणीही केली नाही. कॉंग्रेसनेही हा कायदा लागू करण्याचा विचार मांडला होता. पण त्यांना कायदा लागू करता आला नाही. १९५५ साली तत्कालीन कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकत्व कायदा मांडला होता. त्याकाळी तो मंजूर झाला. आजवर त्या कायद्यात अनेकवेळा सुधारणाही करण्यात आलेल्या आहेत. आतादेखील सरकारने किमान वास्तव्य ११ वर्षाऐवजी ५ वर्ष असा बदल करत हा कायदा मंजूर केला आहे .

या कायद्यान्वये शेजारील तीन राष्ट्रात अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारसी, इसाई अशा समाजांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. या समाजांवर त्या- त्या देशात अन्याय-अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे त्यांना नागरिकत्व देणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याच बांधवाना बांधव म्हणून स्वीकारण्यात काय अडचण आहे, असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले, भारताची धर्मनिरपेक्षता ही हिंदू धर्मनिरपेक्षता आहे. बाहेरून येणाऱ्यांना नागरिकता देत असताना त्यांच्या धर्मासह आपण स्वीकारत आहोत असे सांगून एकदा संसदेने मंजूर केलेला हा कायदा सर्व राज्यांना लागू करावाच लागतो . एखाद्या राज्याने नकार दिला तर ते राज्य बरखास्त करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे.

 

भारतात आज मोठ्या संख्येने घुसखोर वास्तव्य करीत आहेत. आपला देश ही घुसखोरांची धर्मशाळा नाही. घुसखोर हाकलले तर शरणार्थीना सर्व सोयी सुविधा आपण देऊ शकतो. दुर्दैवाने या कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणाऱ्यांनाही नेमका अभ्यास नाही.
- राहुल सोलापूरकर, अभिनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com