file photo
file photo

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बांधावर जा : कृषिमंत्री दादा भुसे 

परभणी : शेतकऱ्यांनो घाबरू नका, संपूर्ण कृषी विभाग आपल्या सोबत आहे. तुम्ही स्वत:सह गावाची काळजी घ्या, असा सल्ला देत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी बांधावर जावे, अशी सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी ऑनलाइन कृषी संवाद कार्यक्रमात केली आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी होणार खरीप मेळावा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करून सोमवारी (ता. १८) विद्यापीठाने मोबाइल ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन कृषी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, परभणी जिल्हा कृषी अधीक्षक संतोष आळसे  यांच्यासह शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी आणि मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी बोलताना कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘लॉकडाउमुळे निर्माण झालेली शेतकरी ते ग्राहक संकल्पना कायम राहिली तर शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही फायदा आहे. या दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे खरीप हंगामा आढावा बैठक घेणार आहेत. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यात नवी उमेद जागविण्यासाठी आणि आधार देण्यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणींची माहिती घेऊन सोडवाव्यात, त्यांना आधार द्यावा. शेतकऱ्यांशी संवाद साधताना आनंद होत आहे. शेतकरी सुद्धा ऑनलाइन साधनांचा वापर करू लागलेत. शेतकरी आधुनिक होत आहेत. ही चांगली बाजू आहे. शेतकऱ्यांनी खत, बियाणांबाबत काळजी करू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्यात आला असून काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी थेट संपर्क करा.’’
 शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावे व त्यासाठी उगवण क्षमता तपासून घेण्याची सूचना त्यांनी केली. कापूस खरेदीचा वेग वाढविण्यासाठी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलने झाले असून लवकरच खरेदीला गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लवकरच कापसाचे बीटी वाण उपलब्ध
 अध्यक्षयीय समारोपात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, ‘‘मजुरांची टंचाई असल्याने यांत्रिकीकरणावर भर दिली जात आहे. मजुरांचे कष्ट कमी करण्यासाठी यंत्र विकसित केली आहेत. उत्पादन खर्च कमी करण्याचे तंत्रज्ञान आणण्यावर भर राहणार आहे. कोरोनामुळे शेतकरी, भाजीपाला उत्पादन शेतकरी थेट ग्राहकांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा. लवकरच कापसाचे बीटी वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.’’

 शेतकऱ्यांनी मांडले प्रश्न
यावेळी त्यांच्याशी प्रताप काळे, धानोरा काळे (ता. पूर्णा, जि. परभणी), मंगेश देशमुख पेडगाव (ता., जि. परभणी), सोपान शिंदे पांगरा शिंदे (ता. वसमत, जि. हिंगोली), रामदास ढाकने (रा. जालना), राधेश्याम अटल,(गेवराई, जि. बीड) या शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नांना मंत्री श्री. भुसे यांनी उत्तरे दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com