जिल्ह्यात केवळ 45 टक्केच कर्जवाटप

file photo
file photo

औरंगाबाद: सुरवातीला कमी झालेल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगामही कोरडा जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, नंतर झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होऊन खरीप हंगामात तब्बल 93.98 टक्के पेरणी झाली. रब्बी हंगामासाठी शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. जिल्ह्यातील बॅंकांनी शेतकऱ्यांना खरीप व रब्बीसाठी 553 कोटी 14 लाखांचे म्हणजे केवळ 45 टक्केच कर्ज वाटप केले आहे. 


मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सावध भूमिका घेतली होती. चांगल्या पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेकांनी पेरणी केली, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात सात हजार 328 हेक्‍टरसाठी खरिपाचे नियोजन केले होते. यातील 93.98 टक्के म्हणजे तब्बल सहा हजार 887 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 

चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीसाठी मोठी मदत होणार आहे; परंतु बॅंकांनी यंदा शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यासाठी हात आखडता घेतलेला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पूर्वीचे कर्ज फेडलेले नसल्यामुळे बॅंकांनी कठोर भूमिका घेतली आहे. बॅंकांना दोन्ही हंगामासाठी 1,760 कोटी कर्ज वाटपाचे लक्ष्य देण्यात आले होते. बॅंकांनी आतापर्यंत केवळ 44.90 टक्के म्हणजे 553 कोटी 14 लाखांचे कर्जवाटप केले आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतकऱ्यांना पैशांसाठी मोठी जमवाजमव करावी लागणार आहे. 



मराठवाड्यात 97 टक्के खरीप पेरणी 
सुरवातीला पावसाने दांडी मारल्याने यंदाचा खरीप हंगामही हातातून जाणारी अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, नंतर झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात 96.99 टक्के पेरणी झाली आहे. कृषी विभागाने 49 हजार 991 हेक्‍टरसाठी नियोजन केले होते. यात 48 हजार 488 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com