सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस - नाना पटोले

सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस - नाना पटोले

गेवराई - कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करीत आहे. हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडणारे असून उपाययोजना मात्र शून्य आहेत, असा आरोप कॉंग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खासदार नाना पटोले यांनी रविवारी (ता. नऊ) केला. 

गेवराई येथील दसरा मैदानावर गुरुवारपासून (ता. सहा) कृषिरत्न गणेशराव बेदरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य शासन, कृषी, पणन विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शेतकरी युवती संघटनेच्या पूजाताई मोरे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, सत्संग मुंडे, दादासाहेब मुंडे, ऍड. सुरेश हात्ते, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, महादेव धांडे, सुनील नागरगोजे उपस्थित होते. श्री. पटोले म्हणाले, शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत असतो. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून असे प्रयोग पुढे येतात. त्यामुळे कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्याने शेती करावी. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपला पाहिजे, अशी भूमिका कॉंग्रेसच्या माध्यमातून उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 

या वेळी पूजाताई मोरे, अमर खानापुरे यांचीही भाषणे झाली. दरम्यान, कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गिरीश थावरे, विष्णू जायभाये, पी. आर. देशमुख, राजेंद्र जाधव, गोकुळ मेघारे, अतिष गरड, सीताराम मस्के आदी शेतकऱ्यांचा "गणेशराव बेदरे कृषीरत्न पुरस्कार' नाना पटोले यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. आयोजक महेश बेदरे यांनी प्रास्ताविक केले. महादेव चाटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

भाजप हा घात करणारा पक्ष - पटोले 
भाजप सरकार घात करणारे असून त्यांनी पक्षात एकनाथ खडसे यांचा घात केला; तसेच गोपीनाथ मुंडे यांचाही यांनीच घात केला, अशी टीका नाना पटोले यांनी केली. सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना, शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याऐवजी शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार घेत आहे. यामुळे मी माझा खासदारकीचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फेकला. शेतकरी विरोधी धोरणामुळे देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी हिताच्या अनेक योजना बंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे आज हयात असते, तर ते नक्कीच माझ्यासोबत असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com