परभणी - परभणीत उष्णतेची तीव्र लाट कायम असून, सोमवारी (ता.27) कमाल तापमान 46.1 अंश नोंदले गेले. उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरात अक्षरशः अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती आहे. दरम्यान, मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही उष्णतेची लाट असून, या हंगामात बीडचा पारा आज प्रथमच 44.0 अंशांवर गेला.
मेच्या पहिल्या आठवड्यात ते कमी होऊन 42 अंशांवर घसरले होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा ते वाढले. रविवारी तापमान 46 अंशांवर होते. येथील भारतीय हवामान विभागाच्या केंद्रात आज दुपारी 46.1 अंश तापमानाची नोंद झाली आहे. बीड शहरासह जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट आली असून, कमान तापमान 44 वर गेले. शहरनिहाय कमाल तापमान अंश सेल्सिअस असे ः नांदेड, हिंगोली, बीड 44.0, उस्मानाबाद 43.0, लातूर 41.0.
उष्माघाताने दोघांचा मृत्यू
शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) - येथे शेतकऱ्याच्या उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल घडली. गंगाधर दामाजी आकमार (वय 52) असे त्यांचे नाव आहे. बैलजोडीच्या साहाय्याने ते मशागत करीत होते. दुपारी चारच्या सुमारास चक्कर आल्याने ते शेतातच बेशुद्ध पडले. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न पतरल्याने कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली. त्या वेळी ते मृतावस्थेत आढळले.
चारठाणा येथील कुंडलिक भिवाजी खाडे (वय 60) यांचा आज दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे ते सलूनमध्ये कार्यरत असताना दुपारी एकच्या दरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
|