या शहरात कांदा खातोय भाव

File photo
File photo

नांदेड : सबंध देशाला रडवणारा कांदा नांदेड बाजारातही भाव खात आहे. येथील ठोक बाजारात सध्या प्रतिक्विंटल कांद्याला एक हजार ते साडेसहा हजार रुपये दर मिळत आहे. हा कांदा स्थानिक शेतकऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रातुन येतो. दररोज शंभर ते एकशे वीस टन कांद्याची आवक नांदेडमध्ये होत आहे. 

मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढल्याने ग्राहकांना कांदा रडवत आहे. किरकोळ बाजारात दहा ते पंधरा रुपये किलो या प्रमाणे मिळणारा कांदा सध्या ऐंशी ते शंभर रुपये दराने विक्री होत आहे. नांदेड जिल्ह्यातही कांद्याचे दर वाढल्याने ग्राहकांना अधीकचे पैसे मोजावे लागत आहे. यामुळे नागरीकांनी जेवणात कांदा खाण्यावर मर्यादा आणावी लागत आहे. मसाल्यातून कांदा हद्दपार झाल्याने जेवणाला रंगत येत नसल्याच्या प्रतिक्रिया काही खवय्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या. जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन जेमतेम असल्यामुळे बाहेर जिल्ह्यातुन येणाऱ्या कांद्यावर जिल्ह्याची गुजरान करावी लागते.

बाजार समितीच्या नियंत्रणा बाहेर
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कांदा बाजार नियंत्रणात येत नाही. यामुळे शहरानजीक असलेल्या बोंडार येथे व्यापाऱ्याचा खासगी स्तरावर कांदा, लसुन, आद्रक या मसाला पिकांचा व्यवहार होतो. या ठिकाणी सध्या अहमदनगर, बार्शी, सोलापूर या भागासह स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो. दररोज किमान शंभर ते एकशे वीस टन कांद्याची आवक होते. या काद्यांचा लिलाव हप्त्यातुन दोन वेळा रविवारी व बुधवारी होतो. रविवारी या बाजारात शंभर टन कांद्याची आवक झाली. या काद्यांला एक हजार रुपये ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची माहिती ठोक व्यापाऱ्यांनी दिली. कांदा दर वाढल्याने हॉटेल तसेच खानावळीवर कांदा दिसेनासा झाला आहे.
 
किरकोळ बाजारात तेजी
जिल्ह्यात कांद्याचा दर मागील दोन महिन्यापासुन तेजीत आहे. एरवी दहा ते पंधरा रुपये दराने मिळणार कांदा सध्या साठ ते सत्तर रुपये दराने मिळत आहे. नुकताच काढणी झालेला नवा कांदा मात्र कमी दराने विक्री होत असला, तरी जुना कांदा मात्र अधीकच्या दराने विक्री होत आहे. नांदेड शहरात व्हीआयपी रोड, तरोडा, हनुमानगड, इतवारा या भागात आठवडे बाजार भरतो. यात कांदा चाळीस ते पन्नास रुपये दराने विक्री होत आहे. परंतु भाजी मार्केटमध्ये मात्र कांदा साठ ते एशी रुपये दराने विक्री होत आहे. तेजीच्या काळात कांद्याची साठेबाजी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.  यामुळेही ग्राहकांना कांदा वाढीव दराने विक्री केला जावु शकतो. शासनाने कांदा साठवणुकीवर लक्ष देण्याची मागणी ग्राहक करत आहेत.

 

महिला म्हणतात.....

दर कमी होण्याची आशा 
दोन महिन्यापासुन कांदा पन्नास रुपयांपेक्षा अधीक दराने मिळत आहे. यामुळे खानावळीच्या खर्चात वाढ झाली असून, ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. नवा कांदा आल्यावर दर कमी होण्याची आशा आहे. - शांताबाई चव्हाण, भाग्यनगर परिसर.

साठवणुक करणा-यांवर कारवाई करावी                           सध्या कांदा महागल्याने आमचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे. व्यापारी कांद्याची साठवण करून ठेवत असल्यामुळे कांद्याचे भाव वाढल्याची माहिती आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने तसेच शासनाने लक्ष देवून  कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कारवाई करावी. - ज्योत्स्ना देशपांडे (गृहिणी)

जगावे की मरावे कळत नाही                                      आमचे हातावर पोट असल्मायाने झे पती व मी दिवसभर मजुरीची कामे करीत आहे. परंतु, प्रत्येक जिवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडल्याने आम्हाला जगावे की मरावे हेच कळत नाही. कांद्याशिवाय कुठलीही भाजी होऊ शकत नाही. मात्र, कांदा महागल्याने कांद्याविना भाजी करावी लागत आहे. - शकुंतलाबाई कोकाटे (गृहिणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com