लातुरातील मालमत्ता सील करणार, आयुक्तांचा मालमत्ताधारकांना इशारा

Latur Municipal Corporation News, Latur
Latur Municipal Corporation News, Latur

लातूर ः महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मालमत्ता कर तसेच महापालिकेच्या गाळेभाड्यात सूट देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्याचा ठराव प्रशासनाकडे आला आहे. त्यानुसार गुरुवारपासून (ता.२७) शहरात वसुली करण्यात येणार आहे. याचा लातूरकरांना लाभ घ्यावा; पण मालमत्ता कराचा भरणा केला नाही तर मात्र मालमत्ता तसेच महापालिकेचे संबंधीत गाळे सील करण्याचा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता.२६) येथे पत्रकार परिषदेत दिला.


महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शहरातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कराच्या थकबाकीवरील सर्व व्याजमाफ केले आहे; तसेच बिलामध्ये बारा टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे; तसेच महापालिकेच्या गाळे भाड्यात रेडीरेकनरच्या पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जे मालमत्ताधारक ता. ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरतील त्यांनाच ही सवलत लागू असणार आहे; तसेच पुढच्या वर्षीच्या सवलतीचाही लाभ मिळणार आहे. याकरिता आता शहरात ठिकठिकाणी वसुली शिबिर लावण्यात येतील. या सवलतीचा लातूरकरांनी लाभ घेऊन महापालिकेले सहकार्य केले पाहिजे. जे कराचा भरणा करणार नाहीत त्या मालमत्ता सील करण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात मॉल्स, शिक्षणसंस्था, मंगल कार्यालय, व्यापार संकुलांसह मोठे थकबाकीदारांचा समावेश असणार आहे; तसेच महापालिकेच्या गाळेधारकांवरही भाडे न भरल्यास ते देखील सील करण्याचा इशारा जी. श्रीकांत यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यातील टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात टँकर लागणार नाहीत. देवणी व लातूर तालुक्यात काही भागांत टँकर लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यावर्षी सहाशे विहिरी घेण्यात येणार आहेत. मांजरा धरणातील पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये म्हणून गस्ती पथके नियुक्त करण्यात आले आहेत. शहराला ऑक्टोबरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अतिरिक्त आयुक्त सतीश शिवणे, उपायुक्त संभाजी वाघमारे, सहायक उपायुक्त सुंदर बोंदर, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव आदी उपस्थित होते.


चारशे २० कोटींचा लाभ
शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ७२ हजार ४५ शेतकऱ्यांना ४२० कोटी १५ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. आधार आधारित ही कर्जमुक्ती आहे. आतापर्यंत ७१ हजार २३६ शेतकऱ्यांचे आधार जोडणी करण्यात आली आहे. बाभळगाव व आष्टा या दोन गावांपासून या योजनेची सुरवात करण्यात आली आहे. काही अ़डचणी येतात का, ते पाहिले जात आहे. लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती जी. श्रीकांत यांनी दिली.


एमआयडीसीतील उद्योग व कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळ्यांच्या कराचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी मोठा कर थकला आहे. या सवलतीच्या त्यांनी फायदा घ्यावा अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
- जी. श्रीकांत, आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com