‘लॉकडाऊन’मध्ये राबविलेला उपक्रम शेतकऱ्यांना लाभदायक, कसा ते वाचा... 

upkram
upkram

सेनगाव ः लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘बाजार समिती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल त्यांच्या घरूनच खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (ता.१३) पहिल्याच दिवशी तीन हजार ९८१ क्विंटल शेतीमाल खरेदी झाला. बाजार समितीच्या इतिहासात तुरीच्या हंगामात पहिल्यांदाच इतक्या क्विंटलची आवक झाली आहे.दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांना गावातच माल विक्री करून पैसे मिळाल्यामुळे आर्थिक चणचण दूर झाली आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. घरात शेतीमाल आहे, पण संपूर्ण व्यवहार ठप्प असल्यामुळे मालविक्री करावी कुठे हा प्रश्न उभा होता. या परिस्थितीचा आढावा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीने सामाजिक दायित्वची भूमिका घेत शेतकऱ्यांचा शेतीमाल व्यापाऱ्यांमार्फत गावातच खरेदी करून लगेच पैसे देण्यासाठी ‘बाजार समिती आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. सोमवारी (ता.१३) बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ११ गावातील शेतकऱ्यांनी समितीला शेतमाल विक्री करण्यासाठी संपर्क केला. विविध व्यापाऱ्यांनी त्याच गावात जाऊन शेतकऱ्यांच्या घरूनच माल खरेदी केला.

गावातील वाहनाद्वारे माल बाजार समितीत 
गावातील वाहनाद्वारे सदरील माल बाजार समितीत पोचविला. मालविक्री झाल्यावर तत्काळ संबंधित शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. पहिल्याच दिवशी तीन हजार ९८१ शेती मालाची खरेदी झाली. त्यामध्ये तूर ३७८१ क्विंटल तर दोनशे क्विंटल हरभरा मालाचा समावेश आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्याकडून शेतीमाल खरेदी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. बाजार समिती आपल्या दारी उपक्रमास भरभरून साथ देणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच अडचण येऊ नये म्हणून प्रशासन योगेश आरसोड, सचिव दत्तात्रय वाघ व कर्मचारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिवसभर समितीच्या प्रवेशद्वारात उभे होते. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी यांना ‘कोरोना’पासून दूर ठेवण्यासाठी सतर्कतेने ते प्रयत्न करत होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम
येथील बाजार समितीच्या तुरीच्या हंगामात एका दिवसात तीन हजार ७८१ क्विंटल तूरीची आवक आजपर्यंत झाली नव्हती. समितीच्या इतिहासात तुरीच्या हंगामात पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक आवक झालेली आहे. मागील काही काळापासून येथील समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यामुळे शेतीमालाची आवक वाढू लागली आहे. प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्यांची सोय कशी होईल, यासाठी समिती प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

अकरा गावातून मालाची खरेदी 
बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत असून भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. ‘बाजार समिती आपल्या दारी’ या उपक्रमाला पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अकरा गावातून तीन हजार ९८१ क्विंटल तूर व हरभरा शेतीमाल खरेदी करण्यात आला आहे. - दतात्रय वाघ, बाजार समिती, सचिव.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com