आखाडा बाळापूर ः ग्रामसभा म्हटल्यावर गोंधळ, आरोप, प्रत्यारोप आणि निधीसाठी भांडणे या सर्व बाबीला फाटा देत आपल्या गावाला तालुक्याचा दर्जा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करून तसा ठराव ग्रामपंचायतने झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. यामुळे या ग्रामसभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे सोमवारी (ता.२३) घेण्यात आलेल्या ग्रामसभेत रामनगर येथील रस्ते व नाली बांधकामाचा मुद्दा चांगलाच गाजला या भागातील नागरिकांनी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला. तसेच बाळापूर तालुकानिर्मिती बाबत ठराव घेण्यात आला.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सरपंच जिया कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी उपसरपंच विजय बोंढारे, ग्रामविकास अधिकारी राजू घुगे यांच्यासह बबन हेंद्रे, संभाजी कुंभकरण, दादाराव बोंढारे, अजहर पठाण, ओमकार अमाने सुभाष ठमके, संजय पांढरे, वैजनाथ हेंद्रे, गोपाल बोंढारे अमोल बोंढारे, गजानन देशमुख, संदीप बोंढारे, दिलीप पतंगे, गजानन बोंढारे, संतोष हेंद्रे पाटील, यशवंत पंडित, माणिक पंडित, भगीरथ पंडित आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा...हिंगोली हिरवेगार करण्याची चळवळ बनली व्यापक
विविध निधीच्या खर्चाला दिली मान्यता
अनेक दिवसांपासून या भागाचा विकास झाला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण झाले होते. मात्र, वेळीच ग्रामपंचायत प्रशासनाने हस्तक्षेप करून हा मुद्दा सोडविला. त्यानंतर ‘आमचा गाव आमचा विकास’ कार्यक्रमांतर्गत पंचवार्षीक विकास आराखडा तयार करण्यात आला, तसेच वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या ग्रामसभेत शहरातील रामनगर मधील रस्ते व नाली बांधकामाचा प्रश्न गाजला. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून पाच टक्के अपंग कल्याण निधी, दहा टक्के महिला बालकल्याण व पंधरा टक्के मागासवर्गीय खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच खर्चाबाबत मान्यता देण्यात आली.
हेही वाचा...शेतकऱ्याचा मुलगा झाला न्यायाधीश
स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात झाली चर्चा
दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली असून जागा उपलब्ध करण्याबाबत ठराव घेण्यात आला. शहरात शंभर टक्के पादंणमुक्त करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कळमनुरी तालुक्याचे विभाजन करून आखाडा बाळापुरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. सार्वजनिक शौचालयचे काम करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा आरक्षित करणे, गावातील नाली बांधकाम करणे यास मान्यता देण्यात आली यासह विविध ठराव घेण्यात आले.
विकासासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशिल
गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाकडून उपलब्ध होणारा निधीतून गावात सर्वत्र विकासकामे केली जाणार आहेत. -विजय बोंढारे, उपसरपंच.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.