औरंगाबाद : अवघ्या तीन दिवसांतच रोझ गार्डन बंद करण्याची वेळ

रोझ गार्डन
रोझ गार्डन

औरंगाबाद - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोझ गार्डन स्वातंत्रदिनापासून सुरू करण्यात आले; मात्र अवघ्या तीन दिवसांत हे गार्डन बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सर्वसाधारण सभेत गार्डनचे प्रवेश शुल्क ठरवून ते चालविण्यासाठी खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तोपर्यंत गार्डन बंद राहील. परिसरातील टवाळखोरांकडून दगडफेक, सुरक्षारक्षकाला मारहाण केली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौरांनी सोमवारी (ता. 19) सांगितले. 

महापालिकेने मजनुहिल परिसरात रोझ गार्डन विकसित करण्याचा निर्णय दहा-बारा वर्षांपूर्वी घेतला होता; पण गार्डनचे काम सुरूच होऊ शकले नाही. दरम्यान तत्कालीन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी केंद्रीय पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून रोझ गार्डनचे काम सुरू केले. या 13 प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली असून, 15 ऑगस्टपासून नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले होते. दहा दिवस मोफत प्रवेश देण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र तीनच दिवसात गार्डन बंद करण्यात आले आहे. गार्डनमध्ये परिसरातील टवाळखोरांनी धुडगूस घातला असून, सुरक्षा रक्षकांना मारहाण करणे, दगडफेक, गुलाबांच्या झाडांची तोडफोड केली जात आहे. काही मद्यपींनी सुरक्षा रक्षकाशी झटापटही केली. त्यामुळे सुरक्षा विभागाने रविवारी (ता. 18) गार्डन बंद करण्याचा निर्णय घेतला. मोफत प्रवेश ठेवल्यास रोझ गार्डनचे नुकसान होण्याची शक्‍यता असून, शुल्क ठरेपर्यंत गार्डन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. 
 
तीन दिवसांत पाच हजार नागरिकांची भेट 
गार्डन खुले झाल्यापासून नागरिकांची गर्दी वाढतच होती. तीन दिवसांमध्ये पाच हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली; परंतु आता गार्डन बंद करण्यात आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. अनेकांनी याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com