आरक्षणाच्या गर्दीत ‘हा’ समाज दूर : कोणता ते वाचा

File photo
File photo

नांदेड : आरक्षणाच्या भाऊ गर्दीमध्ये वासुदेव समाज विकासापासून दूर फेकला गेला. केंद्रामध्ये ‘ओबीसी’ तर राज्यात ‘एनटी ब’ प्रवर्गात या समाजाला गणल्या जात असल्यामुळे शासकीय योजना अद्यापही या समाजापर्यंत पोचलेल्या नाहीत. आजही हा समाज उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे समाजापर्यंत येण्यासाठी शासनाच्या योजना कुठे कमी पडतात या व इतर विषयांकडे लोकप्रतिनिधींनी विचारमंथन करण्याची गरज आहे.

वासुदेव म्हटले, की आपल्या नजरेसमोर आगळ्या वेगळ्या रुपातील वासुदेव दिसतो. एका हातात टाळ, दुसऱ्या हातात चिपळ्या, डोईवर विविधरंगी माळा गुंफलेली मोर पिसाची टोप, त्यावर शिखर असलेले, कपाळी वैष्णव गंध, गळ्यात विविध देवतेच्या माळा, कमरेला बासरी, अंगात अंगरखा अशा देखण्या रुपातील हा वासुदेव सकाळच्या प्रहरी गल्लोगल्ली अवतरत असतो. परंतु, हा वासुदेव आता काळाच्या पडद्याआड होत आहे. वासुदेव समाजाचे दरडोई उत्पन्न सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. शासनाच्या विविध योजनाही या समाजापर्यंत पोचलेल्या नाहीत. शासनाकडून मिळणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य, घर, रोजगार यासारख्या सुविधा समाजापर्यंत पोचत नाहीत. उद्योग, व्यवसाय करण्यासही आर्थिक बळ कमी पडत आहे. त्यामुळे शासनाने वासुदेव समाजाची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज समाजातील ज्येष्ठांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केलेली आहे.

वासुदेव समाज संघाचा पाठपुरावा
या समाजाला केंद्रात ओबीसी तर राज्यात ‘एनटी-ब’ प्रवर्गात गणले जाते. वास्तविक वासुदेव समाजाला पोटजात नाही. तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरणारा हा समाज असल्याने स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे जात पडताळणी, नॉन क्रिमिनल रद्द करावे, स्वतंत्र आरक्षण देवून घरे, सबसिडी, शैक्षणिक सुविधा द्याव्यात. वासुदेव समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आवाज उठवावा अशी मागणी वासुदेव समाज संघाचे भिवराजी घोगरे, गोविंद पेंढारकर, विरेंद्र सातपुते यांनी केली आहे.

वासुदेव समाजामुळे पदोन्नती नाही
मी शासकीय सेवेमध्ये २५ वर्षांपासून यांत्रिक या पदावरच काम करीत आहे. रिक्त जागेवर पात्र असतानाही केवळ वासुदेव समाजाचा असल्याने पदोन्नती मिळू शकलेली नाही. त्यामुळे या समाजाला ‘एनटी-ब’ प्रवर्गातून वेगळे करून स्वतंत्र आरक्षण द्यावे.
- भिवराजी घोगरे
 
भिक्षा मागून उदरनिर्वाह
जिल्ह्यात वासुदेव समाज  सुमारे २५ हजारांच्या आसपास आहे. या समाजाला स्थिरत्व नाही. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा समाज आहे. त्यामुळे आर्थिक तसेच शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. 
- रामकृष्ण डोईजड

इतरांप्रमाणे शिष्यवृत्ती द्यावी
सध्या मी इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. समाजाला स्थिरता नसल्याने आर्थिक चणचण भासत आहे. त्यातच आरक्षणाच्या भाऊगर्दीमध्ये समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. इतरांप्रमाणेच आठ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी.
- अक्षय घोगरे (विद्यार्थी)

मुलांच्या शिक्षणात अडचणी
ग्रामीण, शहरी भागामध्ये पारंपरिक वासुदेवाच्या भूमिकेमध्ये आजही भिक्षा मागतो. धान्याच्या स्वरूपात ही भिक्षा मिळत असल्याने, आर्थिक उन्नती नाही. मला चार मुली, एक मुलगा आहे. शासकीय योजना नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडचणी येतात.
- नरसिंग घोगरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com