उपाशी पोटी जागता पाहारा 

file photo
file photo

आर्थिंक कोंडी , सुरक्षा रक्षक पाच महिन्यांपासून वेतनाविना 

औरंगाबाद : सुरक्षा रक्षक मंडळातर्फे विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. शासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

काय आहे नियम 

राज्य शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या औरंगाबाद कार्यालयामार्फत विविध अस्थापनांना सुरक्षा रक्षक पुरवण्यात येतात. सुरक्षा रक्षकांच्या अधिनियम 1981 व योजना 2002 नुसार सुरक्षा रक्षकांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला वेतन अदा करावे. त्याचप्रमाणे शासकीय अस्थापनांना खासगी सुरक्षा रक्षक घेऊ नये, या उलट सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकंना नियुक्त केले पाहिजे, असे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही अनेक अस्थापाना खासगी सुरक्षा रक्षकांना कामावर ठेवत आहेत; मात्र वेळेवर वेतन देत नाहीत. सुरक्षा रक्षक संघटनेच्या प्रचंड संघर्षानंतर आणि पाठपुराव्यानंतर काही अस्थापना मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना काम देत आहेत; पण वेतन वेळेवर देत नाहीत. 

पाच महिन्यापासून उपासमारी 

जालना जिल्हा शल्य चिकित्सकाअंतर्गत जालना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय रुग्णालये नेर, परतूर, मंठा, भोकरदन, बदनापूर, जाफराबाद, अंबड, टेंभुर्णी, राजूर, महिला रुग्णालय अशा विविध रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना पाच महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. वेतन देण्याच्या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांना सातत्याने पाठपुरावा केला तरीही रुग्णालय प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. 

निधीचे कारण देत टाळाटाळ 

सुरक्षा रक्षकांसाठी निधी नसल्याचे कारण जिल्हा शल्य चिकित्सक सांगत आहे. वेतन केव्हा मिळेल हेही सांगण्यास अधिकारी तयार नाहीत. पाच महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने सुरक्षा रक्षकांची उपासमार सुरू आहे. मुलांच्या शाळेत पाठवणे अवघड झाले आहे. किराणा दुकानदारांनी उधार देणे बंद केले आहे. घरखर्च, उधारी, बॅंकांचे हाप्ते कसे भरावे, घर कसे चालवावे असा प्रश्‍न सुरक्षा रक्षकांना सतावत आहे. 

सचिवांना दिले निवेदन 

सुरक्षा रक्षकांचे थकलेले वेतन तातडीने देण्यात यावेत, यापुढे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वेतन देण्यात यावे. शासकी अस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षक मंडळाच्याच सुरक्षा रक्षकांना काम द्यावे, खासगी सुरक्षा रक्षक ठेवणाऱ्या शासकीय अस्थापनांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी संघटनेचे उपाध्यक्ष सर्जेराव लालझरे, गौतम देहाडे, नेहरू गडवे, सीताराम चव्हाण, विकास राठोड, अप्पाराव करपे,अनिल भालेराव, सुनील बोर्डे, विलास राठोड, सिद्धार्थ दांडगे यांनी केली आहे. या संदर्भात सुरक्षा रक्षक संघटनेतर्फे विभागीय आयुक्त तसेच सुरक्षा रक्षकांच्या सचिवांना निवेदने देण्यात आले आहेत. 


जालना जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत असलेल्या विविध रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना पाच महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. निधी नसल्याचे कारण सांगत वेतन देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. तातडीने वेतन न मिळाल्यास आंदोलनात्मक पावित्रा घेण्यात येणार आहे. 
- सर्जेराव लालझरे, उपाध्यक्ष सुरक्षा रक्षक संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com