ज्‍येष्ठ सर्वोदयी विचारवंत डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल कालवश

Senior thinker Dr Gangaprasadji Agarwal Passes Away
Senior thinker Dr Gangaprasadji Agarwal Passes Away

हिंगोली - ज्‍येष्ठ सर्वोदयी विचारवंत तथा स्‍वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल (वय 96) यांनी गुरुवारी (ता. 11) वसमत (जि. हिंगोली) राहत्‍या घरी अखेरचा श्वास घेतला. मराठवाड्याचे महात्‍मा गांधी म्‍हणून त्‍यांची ओळख होती. 

हिंगोली जिल्‍ह्‍यातील वसमत या गावी 1923 मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली. तेव्हाच त्यांचे नाते गांधी-विनोबा आणि स्वातंत्र्यसंग्राम व भूदान आंदोलन यांच्याशी जोडले जाणार हे निश्चित झाले. महाविद्यालयात शिकत असताना ‘चले जाव’ चळवळीत आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाचा सहभाग दिला. त्यानंतर मराठवाड्यातील गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव इत्यादी दिग्गजांच्या बरोबर अनेक सामाजिक आघाड्यांवर त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून भूमिका निभावल्या.

स्वातंत्र्योत्तर भारतात गांधींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा 
सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, 1962 व 65 च्या युद्धाच्या वेळी शांतिसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर आंदोलन, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडी सांभाळणे, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापना कार्य, जंगल-जल-जमीन यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी खूप मोठी यादी त्यांच्या 70 वर्षांतील सामाजिक कार्याबाबत सांगता येईल. 1953 मध्ये वसमत नगर 
परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, तसेच 2000 मध्ये वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

मागील काही वर्षापासून डॉ. अग्रवाल आजारी होते. चार दिवसापूर्वीच त्‍यांना नांदेड येथील खाजगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. त्‍यांची प्रकृती ढासळत असल्‍याने त्‍यांना मंगळवारी (ता. 9) रात्री वसमत येथे आणण्यात आले. आज दुपारी एक वाजता त्‍यांनी अखेरचा श्वास घेतला. त्‍यांच्‍या निधनाने मराठवाडा मुक्‍ती संग्रामातील धगधगते व्यक्‍तीमत्‍व हरवल्‍याच्‍या प्रतिक्रिया व्यक्‍त केल्‍या जात आहे. त्‍यांच्‍या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्‍यांच्‍यावर शुक्रवारी (ता. 12) सकाळी दहा वाजता वसमत येथील वैकूंठधाम स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार केले जाणार असल्‍याचे त्‍यांच्‍या निकटवर्तीयांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com