उस्मानाबाद: शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी त्याचा ग्रामीण भागातील फैलाव रोखण्यासाठी ट्रेसिंगवर भर देऊन तत्काळ विलगीकरण करण्याची गरज आहे. गरज भासल्यास प्रत्येक गावातील शाळेतच आयसोलेशनची सुविधा करावी, अशा सूचना पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला दिल्या.
शिवाय जिल्ह्याला लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज सध्या तात्पुरत्या स्वरूपात पुरेशी झाली असून, जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखाना येथील ऑक्सिजन निर्मिती प्लॅंट युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती गडाख यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
पालकमंत्री श्री. गडाख म्हणाले, ‘‘जिल्ह्याची एकूण ऑक्सिजनची गरज सध्या परिपूर्ण होत आहे. बेल्लारी येथून एक टँकर आला आहे. त्यामुळे स्टॉक वाढला आहे. याशिवाय जिल्ह्यातील चार तालुक्यांत एअर ऑक्सिजन निर्मिती प्लँट होणार आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी ऑक्सिजनची गरज सिलिंडरच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल.’’
ट्रेसिंग वाढवा, ‘आशां’च्या कामांची दखल घ्या
सध्या ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्त्या ट्रेसिंगचे काम वेगाने करीत आहेत. सुमारे पाच लाख नागरिकांचे ट्रेसिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये १,८०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, ट्रेसिंगचे हे प्रमाण वाढवून ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात ठेवावा. ज्या आशा कार्यकर्त्या कामात मदत करीत आहेत. त्यांची दखल घेऊन त्यांना त्याचा योग्य मोबदला देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. गडाख यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.