जालना - विकासाच्या नावाखाली पक्षांतर करणाऱ्यांनी पंधरा वर्षे मंत्री असताना कोणाचा विकास केला, असा सवाल करत अशा नाठाळ बैलांना येत्या निवडणुकीत बाजार दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जालन्यातील सभेत बोलताना केले. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीवेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मश्गूल होते. महाराष्ट्रातील गड, किल्ले शौर्याचे प्रतीक आहेत. या किल्ल्यांवरून ‘छम छम’चा इतिहास तुम्ही सांगणार आहात का, असा खोचक प्रश्न त्यांनी सरकारला केला.
या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राजेश टोपे, पुंडलिक हरी दानवे, अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, विजय अण्णा बोराडे, डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.
केंद्र, राज्य सरकारवर तोफ डागताना पवार म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने उद्योगपतींसाठी पायघड्या टाकल्या असून, त्यांच्यासाठी बॅंकेत ८८ हजार कोटी जमा केले. संकटात असलेल्या बळिराजाच्या कर्जमाफीसाठी मात्र टाळाटाळ केली जात आहे. देशातील अनेक उद्योग बंद पडल्याने अनेक युवकांना रोजगार गमवावा लागला आहे. बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड भर पडत आहे. अशा स्थितीत महाभरतीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास सरकारचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.