शिल्लेगाव (जि. औरंगाबाद) - राज्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी, तसेच कर्जमाफीकडून कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी आणि बळिराजाच्या जीवनात परिवर्तन यावे यासाठी खऱ्या अर्थाने शक्ती देण्याचा आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगागिरी महाराजांकडे मागितला.
गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा या ठिकाणी शुक्रवारी श्री सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 170 अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, नगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, महापौर भगवान घडामोडे, महंत रामगिरी महाराज आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की मी मेहनत करतोय तर माझा हरी माझी चिंता करतोय. ही ताकद केवळ अध्यात्मामध्ये असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'गुरूंनी आपल्याला जे आशीर्वाद आणि ज्ञान दिले आहे, त्या ज्ञानाची ही ताकद आहे. हेच ज्ञान खऱ्या अर्थाने आपल्याला आज्ञानापासून ज्ञानाकडे आणि शांतीकडे नेते.''
या सप्ताहामध्ये प्रसादाच्या स्वरूपात दहा लाख भक्तांना बुंदीचे लाडू आठ मिनिटांमध्ये वाटण्याचा आणि एकाचवेळी दहा लाख भक्तांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होण्याचा असे दोन विक्रम या वेळी घडले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना या वेळी प्रदान करण्यात आले.
|