हिंगोली ः औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणातून पुर्णानदीपात्रात मागच्या तीन दिवसांपासून राहटी बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग नदी काठावर असलेल्या तेरा ते चौदा गावातील शेतकऱ्यांच्या विहिरी व विंधन विहिरीसाठा झाल्याने पाणीपातळी वाढल्याने त्याचा उपयोग पिकांना पाणी देण्यासाठी होणार आहे.
सिध्देश्वर धरणात यावर्षी शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून जाणाऱ्या कालव्याला देखील पाणीपातळी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा उपयोग, हिंगोली, वसमत शहरासाठी देखील होतो. तसेच धरणातील पाणी राहटी बंधाऱ्यात सोडल्यावर त्याचा उपयोग परभणी व नांदेड शहरासाठी देखील पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. मागच्या तीन दिवसांपासून पुर्णानदी पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे हे पाणी राहटी बंधाऱ्यापर्यंत पोहण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतर पाणी बंद केले जाते.
या पाण्यावर उन्हाळी पिके
नदीपात्रात पाणी सोडल्यावर त्याचा लाभ नदीच्या काठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी व विंधन विहिरीसाठी होतो. नदीपात्रात पाणी सोडल्यावर पाणी पातळी वाढते, त्याचा उपयोग शेतकऱ्यांना पिकाना पाणी देण्यासाठी होतो. सध्या या नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या रुपूर, धार, भगवा, चिमेगाव, अनखळी, पोटा, पेरजाबाद, बेरूळा, नांदखेडा, नालेगाव आदी गावातील नदीकाठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दरवर्षी तीन ते चार वेळेस सिध्देश्वर धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात देखील नदीकाठावरील विहिरी व विंधन विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होवून शेतकरी या पाण्यावर उन्हाळी पिके घेतात.
हेही वाचा - Video: अबब...! मोबाईल ‘रेंज’साठी झाडावर स्वारी
पुर्णानदी काठावरील जमिनीला फायदा
औंढा नागनाथ तालुक्यातील वाहणाऱ्या पुर्णानदी पात्राच्या काठावर येणाऱ्या गावात एक हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. या गावातील शेतकरी नदीपात्रात असलेल्या पाण्याच्या भरावशावर रब्बी व उन्हाळी पिके घेतात. या भागातील जमीन टाळकी ज्वारीसाठी चांगली असल्याने टाळकीचे पिक जोमात येते. या भागातील टाळकी ज्वारीला जिल्हाभरात मोठी मागणी असते. तसेच या ज्वारीचा कडबा घेण्यासाठी देखील दुरवरचे शेतकरी त्याची खेरदी करतात.
बेरुळा, पेरजाबाद येथे कोल्हापूरे बंधारे बांधवेत
नदीपात्रात राहणाऱ्या पाण्यामुळे जनावरांना देखील उन्हाळ्यात हिरवा चारा मिळतो तसेच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते, तसेच वन्यप्राण्यांना देखील उन्हाळ्यात नदीपात्रातील पाण्याचा उपयोग होतो. यामुळे या नदीत सोडणाऱ्या पाण्याचा अनेकांना लाभ होतो. दरम्यान या नदीपात्रात धार व माथा या गावाच्या व बेरुळा व पेरजाबाद येथे कोल्हापूरे बंधारे बांधवेत, अशी मागणी नवनाथ रणमाळ, त्र्यंबक रणमाळ,दतराव रणमाळ, रामप्रसाद रणमाळ, पांडूरंग रणमाळ, शिवाजी कुटे, भाऊराव कुटे, लखन कुटे, ज्ञानेश्वर कुटे, रामेश्वर कदम, संजाब जायभाये आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.