उदरनिर्वाहाचा प्रश्न, तरीही कोरोनाला हरविण्याची जिद्द 

hingoli photo
hingoli photo

शिरड शहापूर (जि. हिंगोली) : येथील जयभवानी कला मंडळातर्फे गोंधळाच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात जनजागृती केली जात आहे. शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वेळोवेळी हात धुवा, मास्कचा वापर करा, असे ते गोंधळाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत.

शिरडशहापूर येथे अनेक वर्षांपासून गोंधळी समाजबांधव राहतात. लग्नकार्यासह विविध धार्मिक कार्याप्रसंगी गोंधळ करून त्‍यातून मिळणाऱ्या मानधनावर उपजीविका करतात. तसेच गोंधळाच्या माध्यमातून गावोगाव शासनाच्या विविध योजनांसंदर्भातदेखील जनजागृती करतात. 

राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम

यात व्यसनमुक्‍ती, स्‍त्री-भ्रूण हत्या, हुंडाबंदी, स्‍वच्‍छता मोहीम, पाणंदमुक्‍ती आदी संदर्भात गोंधळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. या मंडळाने आतापर्यंत जिल्‍हाभरासह राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत. अनेक चॅनल्‍सवरदेखील त्‍यानी गोंधळ सादर करून दाद मिळविली आहे.

कला सादर करण्याचे काम सुरूच

दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाडन सुरू झाले. जमावंबदी, संचारबंदी सुरू झाल्याने गावोगाव जाणे बंद झाले. यामुळे ते अडचणीत आले आहेत. मात्र, त्‍याकडे दुर्लक्ष करीत आपली कला सादर करण्याचे काम त्‍यांनी सुरूच ठेवले आहे. कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी शासन अनेक उपयायोजना राबवित आहे. 

कोरोनासंदर्भात जनजागृती 

यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, शासनाचे अधिकारी यासह ग्रामपातळीवर काम करणारे आरोग्य पथक, व्हीआरआरटी पथक वेळोवेळी मार्गदर्शक सूचना करीत आहेत. यामुळे जयभवानी कला मंडळाचे प्रमुख नारायणराव धोंगडे, संबळ वादक देविदास धोंगडे, रामराव धोंगडे, पांडुरंग धोंगडे, आनंद धोंगडे यांनी सहभाग घेत कोरोनासंदर्भात जनजागृती सुरू केली आहे.

सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करावे

 शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी न जाता घरातच थांबावे, अत्‍यावश्क काम असल्यासच घराच्या बाहेर पडावे, जातांना तोंडाला मास्‍क किंवा रुमाला बांधावा, घरी आल्यावर साबाण किंवा सॅनिटायझरचा वापर करून हात धुवावेत, बाजारात खरेदी करताना सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करावे आदींची गोंधळाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

आर्थिक मदत देणे गरजेचे

सध्या लॉकडानमुळे आमच्या समोर अनेक अडचणी आहेत. गाव सोडून जनजागृतीसाठी बाहेर जाता येईना. सीमा बंदीमुळे दुसऱ्या जिल्‍ह्यात जाता येत नाही. गावात राहिलो तरी उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. शासनाने आमच्या सारख्या समाजप्रबोधानातून जनजागृती करणाऱ्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
-नारायणराव घोंगडे, प्रमुख, जयभवानी कला मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com