औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत व्हॉट्सऍपवर अनेक संदेश फिरत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने लवकरच निकालाच्या तारखा निश्चित केल्या जातील, असे स्पष्ट केले आहे.
दरवर्षी बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर केला जातो. दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखांबद्दल माहिती देणारे व्हॉट्सऍप संदेश सध्या अनेक ग्रुप्समध्ये फिरत आहेत. यामध्ये बारावीचा निकाल हा 27 मे रोजी, तर दहावीचा निकाल सहा किंवा आठ जूनला मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येईल, असे म्हटले जात आहे. मात्र, मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत तूर्तास कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
निकाल वेळेत लागण्याची शक्यता
लोकसभा निवडणुका आणि परीक्षांचा कालावधी एकच असल्याने शिक्षकांना मतदानाच्या कामातून वगळण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली होती. परंतु, त्यानंतर अनेक शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावल्याने त्यांच्यात पेपर तपासणीबाबत नाराजी होती. मात्र, मंडळातर्फे निकालाबाबतची प्रक्रिया वेळेत झाल्याने दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे.
|