ईस्लापूरमध्ये किसान सभेचा रास्ता रोको

RASTA ROKO
RASTA ROKO

इस्लापुर (जिल्हा नांदेड) :  शेतकऱ्यांना दुष्काळात झालेल्या पिकांच्या नासाडीची नुकसान भरपाई मिळावी यासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता.१८) रोजी किनवट-नांदेड राज्यमार्गावरील इस्लापुर येथील सावरकर चौकात परिसरातील शेतकऱ्यांनी किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले.


    या वेळी उपस्थित सर्व आंदोलकाना व शेतकऱ्यांना अर्जुन आडे व खंडेराव कानडे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत मार्गदर्शन केले. आंदोलनात खंडेराव कानडे, मोहन जाधव, रंगराव चव्हाण, सिताराम आडे, स्टॅलिन आडे, राजु आडे, वसंत नाईक, इंद्रसिंग आडे, टिकाराम राठोड, दिपसींग राठोड, बाबु पवार, दिलीप राठोड, बाबु गाडेकर यांच्यासह इस्लापुर, जलधारा, शिवणी परिसरातील शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी व किसान सभेचे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडु नये, म्हणुन इस्लापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलिस उपनिरीक्षक केशव जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

या आहेत प्रमुख मागण्या..?

परतीच्या अवकाळी पावसाने गेल्या महिण्यात नुकसान झालेल्या कापुस, ज्वारी, सोयाबीन या पिकासह अन्य पिकांच्या नुकसानीची एकरी शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
ओला दुष्काळ जाहीर करावा.
सरकारी हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करावी.
शैक्षणिक शुल्कमाफी करून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे.

अर्धा तास वाहतूक ठप्प

आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत व सरकारच्या कारभाराबाबत जोरदार घोषणाबाजी करत हा राज्यमार्ग अडवुन धरल्याने या राज्यमार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुक पुर्ववत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.  

जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रकार 

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. हिशोब करता शेतकऱ्यांना गुंठ्याला यानुसार केवळ ८० रुपयेच मदत मिळणार आहे. बागायती पिकांना गुंठ्याला केवळ १८० रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांनी या वेळी केला. 

मदतीने बियाणांचा खर्च सुध्दा भागणार नाही 

आज कांद्याच्या रोपाच्या एका वाफ्याचा दर पाच हजार रूपये झाला आहे. बागायती पिकांचा उत्पादन खर्च तर प्रचंड आहे. अशा पार्श्वभूमीवर ८० रूपयांत किंवा १८० रूपयांत नुकसान झालेल्या पिकांची भरपाई तर सोडाच, गुंठ्याला लागणारा साधा बियाणांचा खर्च सुध्दा भागणार नाही हे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना, शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली ही मदत मान्य आहे का असा सवाल किसान सभा उपस्थित करत आहे. 
    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com