महिला शेतकऱ्यांची जिद्द; सोशल मीडियाला बनविली द्राक्षाची बाजारपेठ 

aundha nagnath photo
aundha nagnath photo

हिंगोली : औंढा नागनाथ येथील मीनाबाई पाठक महिला शेतकऱ्याने स्वकर्तृत्वाने एक एकर क्षेत्रावर द्राक्षाची बाग फुलवली. केवळ बाग फुलविली नाही, तर लॉकडाउनच्या काळातही नाउमेद न होता सोशल मीडियाच्या माध्यमातून द्राक्ष खरेदीदार शोधत त्यांना द्राक्षांची जागेवरूनच विक्री सुरू केली आहे. जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असेल तर अडचणीतूनही मार्ग काढता येतो, हे श्रीमती पाठक यांनी दाखवून दिले आहे.

औंढा नागनाथ येथील मीनाबाई पाठक यांनी तीन वर्षांपूर्वी एक एकर क्षेत्रावर साधी सोनाका या द्राक्ष वाणाची सुमारे २२०० रोपांची पाच बाय सहावर लागवड केली. त्यानंतर बांबू, लोखंडी खांब रोवून त्यावर तारेची जाळी तयार करून द्राक्षांची वेली त्यावर सोडण्यात आली. यात त्यांना मोठा खर्च आला. 

जिल्ह्यातील द्राक्षाची पहिलीच बाग

आतापर्यंत शंभरच्या वर फवारण्याही करण्यात आल्याचे मीनाबाई पाठक सांगतात. हिंगोली जिल्ह्यातील द्राक्षाची ही पहिलीच बाग आहे. एका महिला शेतकऱ्याने वेगळा पर्याय निवडून हा प्रयोग यशस्वी केला. सध्या द्राक्ष बाग चांगलीच लगडली आहे. यात त्यांचा मुलगा सोमेश पाठक हा मदत करतो. ही बाग पाहण्यासाठी अनेक शेतकरी येतात. आता ही रोपे तीन वर्षांची झाली असून साधारण दोन वर्षांपासूनच द्राक्ष घेण्यास सुरवात झाली आहे.

लाख रुपयांच्या द्राक्षांची विक्री

 मागील वर्षी वेली लहान असताना सुद्धा तीन लाख रुपयांच्या द्राक्षांची विक्री झाली. या वर्षी वेली मोठ्या झाल्या आणि द्राक्षाचे घड ही मोठ्या प्रमाणात लागले आहेत. परंतु, कोरोनामुळे संकट निर्माण झाले. लॉकडाउन सुरू असल्याने संपूर्ण बाजारपेठ, आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे व्यापारीदेखील द्राक्षाची बाग खरेदी करण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. 

मीनाबाई पाठक यांची जिद्द

द्राक्षांची खेड्यापाड्यांत विक्री करावी तर अनेक गावचे रस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बंद केले आहेत. त्यामुळे द्राक्षाचे घड पिवळे पडत आहेत. द्राक्षासाठी घेतलेली मेहनत व केलेला खर्च वाया जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, मीनाबाई पाठक यांची जिद्द व मेहनत करण्याची तयारी पाहता त्यांनी द्राक्ष जागेवरूनच विक्री करण्याचा निर्णय घेतला. 

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विक्री

यासाठी सोशल मीडियाची मदत घेत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किरकोळ व्यापाऱ्यांना त्‍याची विक्री सुरू केली. तसेच जागेवरूनही त्या द्राक्षाची विक्री करत आहेत. याला चांगलाच प्रतिसाद मिळत असून नागरिकही द्राक्ष खरेदीसाठी जात आहेत. येथेही द्राक्षाची विक्री करताना सोशल डिस्‍टन्सचा प्रयोग राबविला जात आहे.

आर्थिक मदत करावी

 या वर्षी द्राक्ष विक्रीतून मोठा नफा मिळणार नसला तरी शेतकऱ्यांनी जिद्द बाळगल्यास जिवापाड जपलेल्या पिकास जागेवरूनही खरेदीदार मिळू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. दरम्यान, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

व्यापाऱ्यांना जागेवरूनच द्राक्षांची विक्री

या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बाजारात द्राक्ष विक्रीसाठी घेऊन जाता येत नाहीत. तसेच मोठे व्यापारीदेखील खरेदीसाठी येत नाहीत. त्‍याला पर्याय म्‍हणून किरकोळ व्यापाऱ्यांना जागेवरूनच द्राक्षांची विक्री करीत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लगडले आहेत. थोडेफार नुकसान होणार आहे. मात्र, विक्रीदेखील सुरूच आहे.
-मीनाबाई पाठक, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com