औरंगाबाद - हवाई दलाच्या "सुखोई-30' या विमानांनी गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी शहरावरून घिरट्या घातल्या. ऐन निवडणुकीच्या काळात हवाई दलाची विमाने शहरावर फिरताना दिसल्याने दिवसभर चर्चेला उधाण आले होते; मात्र हा हवाई दलाच्या नियमित सरावाचा भाग असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांनी गुरुवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान शहरावर घिरट्या घालण्यास सुरवात केली. प्रचंड आवाज असलेल्या लढाऊ विमानांनी लक्ष वेधून घेतले. या विमानांनी शहरात तीन घिरट्या मारल्या. याबाबात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की हवाई दलाची विमाने पुण्यातील लोहगाव येथून मुंबईकडे रवाना झाली. चिकलठाणा विमानतळाकडून वेळेवर सिग्नल न मिळाल्याने त्यांना शहरावर घिरट्या माराव्या लागल्याचे सांगण्यात आले. हा हवाई दलाचा नियमित सरावाचा भाग असून, वेळोवेळी असा सराव केला जात असतो त्यात वेगवेगळ्या शहराची निवड केली जाते, असे सूत्रांनी सांगितले. सकाळी या विमानांनी घिरट्या घातल्या, तर सायंकाळी पुन्हा दोन विमाने शहराच्या हद्दीतून गेली.
|