भोकरदन : सध्या सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्या आणि मामाचे गाव हे समीकरण जणू ठरलेलेच होते. मात्र आता सुट्यांनंतर मामाच्या गावात जाण्याऐवजी मुले क्लासेस व समर कॅम्पमध्ये धमाल करत असल्याचे दिसत आहे.
सध्या उन्हाळी शिबिराच्या निमित्ताने का होईना मुलांचा घरात गोंधळ नसल्यामुळे बहुतांश पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तर काही पालकांचा मात्र मुलांसोबतचा संवाद कमी होत चालल्याचेही दिसत आहे.
सध्या विविध खाजगी शाळांनी तीन ते सात वर्षांच्या मुलांसाठी समर कॅम्प आयोजित केले आहेत. यामध्ये नृत्य, योगा, संगणक प्रशिक्षण,संगीत, विविध खेळ आधी गोष्टी शिकवल्या जातात. aसमर कॅम्पचा कालावधी हा फक्त दोन ते तीन तासांचा असतो, मात्र येथे देखील मुलांना शाळेसारखेच काही प्रमाणात हसत-खेळत शिस्तीचे वातावरण असते.
आजकाल लहान मुले देखील मोबाईल सहजपणे हाताळतात, त्यातील व्हिडिओ, रिल्स व कार्टूनमुळे मुले मैदानी खेळ व संघभावना, संस्कृती, संस्कार या गोष्टींपासून दुरावत चालले आहेत. बाल संस्कार वर्गाच्या माध्यमातून त्यांना श्लोक विविध स्तोत्र तसेच आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यात येते.
— हेमा देशमुख, संचालिका, बालसंस्कार वर्ग, भोकरदन
नवीन वर्गाचा शाळांचा अभ्यासक्रम हा एप्रिलपासूनच सुरू होतो. त्यामुळे शालेय मुलांना फक्त एकच महिना सुट्या मिळतात. आजच्या स्पर्धेच्या युगात शाळा व इतर उपक्रम यामुळे मुलांचा पालकांशी संवाद कमी होत आहे.
— दिपाली वडगावंकर, पालक, भोकरदन